प्रतिनिधी / कोल्हापूर
सावर्डे (ता. कागल) येथील अपहत बालक वरद रविंद्र पाटील (वय 7) याचा खून नाक व गळा दाबून केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. संध्याकाळी जेवणानंतर केवळ अर्ध्या तासात वरदचे अपहर आणि त्याचा खून या दोनही गोष्टी केल्याची कबूली संशयीत आरोपी दत्तात्रय उर्फ मारुती तुकाराम वैद्य (वय 42 रा. सोनाळी ता. कागल) याने दिल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वरद आपल्या आजोळी सावर्डे बुद्रुक येथे आजोळी वास्तूकशांतीच्या कार्यक्रमासाठी मंगळवार (17) रोजी गेला होता. रात्री सव्वाआठच्या सुमारास तो घरातून बाहेर गेला. रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने कुटूंबियांनी त्याचा शोध घेतला. बुधवारी सकाळी वडील रविंद्र पाटील यांनी मुरगुड पोलीस ठाण्यात वरदचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. शुक्रवार (20) रोजी सकाळी 8 वाजता वरदचा मृतदेह सावर्डे बुद्रुक येथील लक्ष्मीनगर परिसरातील शेतवडीत आढळून आला होता.
या प्रकरणी पोलीसांनी तपासाची चक्रे गतिमान दत्तात्रय उर्फ मारुती तुकाराम वैद्य याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने खूनाची कबूली दिली. तसेच नाक व गळा दाबून खून केल्याची कबूली दिली. यानंतर गेल्या 24 तासात मारुती वैद्य याच्याकडे कसून चौकशी सुरु आहे. मारुतीने खून केल्याची कबूली देत घटनास्थळ दाखवले. मात्र खून करण्याचे कारण अद्यापही पोलीसांसमोर अस्पष्ट आहे. याबाबत मारुती पाटील पोलीसांना चकवा देत असून खूनाची अनेक कारणे सांगत आहे. मात्र मंगळवारी रात्री जेवण झाल्यानंतर केवळ अर्ध्या तासात वरदचे अपहरण आणि खून या दोनही गोष्टी केल्याची कबूली त्याने दिली. त्याला बोलण्यात गुंतवून माळावर नेले आणि तेथेच त्याचा गळा दाबून खून केल्याचेही सांगितल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
नरबळी नव्हेच वरद पाटील याचा खून नरबळीतून झाल्याचा संशय होता. मात्र याबाबत कोणतेच पुरावे घटनास्थळी पोलीसांना मिळाले नाही आहेत. यामुळे नरबळीतून खून ही शक्यता मागे पडली आहे. संशयीत दत्तात्रय वैद्य हा चौकशी दरम्यान पोलीसांना गुंगारा देण्यासाठी वेगवेगळी माहिती देत आहे. यामुळे खुनाचे नेमके कारण अद्यापही अस्पष्ट आहे. यामुळे पोलीस सर्व शक्यता पडताळून तपास करत आहेत. |
अफवांवर विश्वास ठेवू नका : पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे
वरद पाटील खून प्रकरणाचा तपास योग्य दिशेने आणि शास्त्रीक्त पद्धतीने सुरु आहे. संशयीत आरोपी दत्तात्रय वैद्य याला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र तरीही सोशल मिडीयावर अनेक अफवा पसरत आहेत. या अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी केले.
गुरुवार पर्यंत पोलीस कोठडी
संशयीत आरोपी मारुती पाटील यास शनिवारी न्यायालयामध्ये हजर केले. न्यायालयाने त्याला गुरुवारी (26) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. मोठा पोलीस बंदोबस्तामध्ये मारुती पाटील यास न्यायालयात हजर करण्यात आले. पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करवीर पोलीस उपअधिक्षक आर. आर. पाटील, सहाय्यक निरीक्षक विकास बडवे या प्रकरणाचा तपास करत आहेत.