दहावे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
प्रतिनिधी /बेळगाव
पैशाच्या देवाण-घेवाणीतून चौघांनी एकाचा खून केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. याप्रकरणी त्या चौघांवर गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी दहावे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुरू होती. सरकारी पक्षाला ठोस पुरावे दाखल करता आले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने चौघा संशयितांची निर्दोष मुक्तता केली आहे.
बाबले गोपाळ पवार, बबन विठ्ठल पवार, अंकुश दुलेखान निकम आणि गोपाळ अर्जुन पवार सर्व रा. माडीगुंजी, ता. खानापूर अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत. हे चौघे आणि मयत मुरलीधर वसंत निकम हे शिवलिंग भुशी, रा. नंदगड यांच्याकडे झाडे तोडण्याचे काम करत. संशयित आणि मयत मुरलीधर यांच्यात पैशाचा व्यवहार होता. यातून वरील सर्व संशयितांनी मुरलीधर वसंत निकम याला जोरदार मारबडव केली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर 16 फेब्रुवारी 2017 रोजी हलसालच्या जंगलात त्यांचे प्रेत पुरण्यात आले. त्याला मारबडव करताना त्याची पत्नी, आई-वडील व इतर तिघांनी पाहिले होते. त्यानंतर या सर्वांनी नंदगड पोलिसात 19 फेब्रुवारी 2017 रोजी फिर्याद दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून वरिष्ठाना माहिती दिली. तत्कालिन प्रांताधिकारी राजश्री जैनापुरे यांच्यासमोर प्रेत उकरून काढून पंचनामा केला. शवविच्छेदनानंतर मारहाण झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. या सर्वांवर गुन्हा दाखल करून अटक केली होती.
पोलिसांनी दहावे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्या चौघांवर दोषारोप दाखल केले होते. त्याठिकाणी 15 साक्षीदार, 25 कागदपत्रे, 1 मुद्देमाल तपासले. यावेळी फिर्यादीमध्ये अनेक त्रुटी आढळल्या. पोलीस तपास योग्यप्रकारे केला गेला नाही. वनविभागात ही घटना घडल्यानंतर तसेच प्रेत उकरून काढताना वन विभागाला कळविले नाही. ज्या काठीने मारहाण केली होती ती जप्त करताना वाकडी होती. त्यावर पंचांच्या सहय़ाही नव्हत्या. मृत दारू प्यायला असताना दारूचा अंशदेखील दाखविला नाही. साक्षीदारांतील विसंगतीमुळेच या सर्वांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. संशयितांच्यावतीने ऍड. सुधीर एम. गावडे, ऍड. एम. एम. बाळप्रवेश यांनी काम पाहिले.