मनपाच्या खुल्या जागांचे अस्तित्व धोक्यात
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेच्या मालकीच्या राखीव खुल्या जागांचे संरक्षण करण्याची जबाबदारी मनपाची आहे. मात्र खुल्या जागांचे संरक्षण करण्यात मनपा प्रशासन अपयशी ठरल्याचे निदर्शनास आले आहे. ठिकठिकाणी खुल्या जागांवर फलक लावून तारेचे कुंपन घातले होते. पण काही दिवसानंतर सदर जागावरील फलक गायब झाल्याचे प्रकार उघडकीस येत असून राखीव जागांवर पाणी सोडण्याची वेळ आली आहे.
नवीन वसाहतीचे लेआऊट करताना नागरी सुविधांकरिता तसेच रस्ते आणि उद्यान निर्माण करण्यासाठी जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. नव्या वसाहतीचे लेआऊट बुडाकडून करण्यात येते. लेआऊट करण्यापूर्वी नागरी सुविधांसाठीच्या राखीव जागा, उद्यानाची जागा आणि रस्ते हस्तांतर करून घेण्यात येत होती. त्यानंतर रस्ते आणि उद्यानाची राखीव जागा महापालिकेकडे हस्तांतर करण्यात येत होती. शहर आणि उपनगरात असंख्य उद्यानाच्या जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. महापालिकेकडे जागा हस्तांतर केल्यानंतर बहुतांश जागांभोवती तारेचे कुंपन घालून ‘बेळगाव महापालिका खुली जागा’ असे फलक लावण्यात आले आहेत. पण कालांतराने खुल्या जागावरील फलक गायब होऊन वाद निर्माण झाल्यामुळे महापालिकेला अनेक राखीव जागा गमवाव्या लागल्या आहेत.
महापालिकेच्या शेकडो खुल्या जागा असून या जागांवरील फलक गायब झाल्याने खुल्या जागांची माहिती मनपाच्या अधिकाऱयांना नाही. उद्यानासाठी खुल्या ठेवण्यात आलेल्या जागावरील फलक रातोरात गायब होत असून सीटीएस उताऱयामधील मनपाचे नाव गायब होत असल्याने मालकी हक्क गमावावा लागल्याचे प्रकार घडले आहेत. असे प्रकार सातत्याने घडूनदेखील महापालिकेचे अधिकारी गाफील असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.
खुल्या जागांचे संरक्षण कोण करणार?
शहर आणि उपनगरात असंख्य खुल्या जागा आहेत. काही जागांचे संरक्षक कुंपण खराब झाले असून फलकदेखील हटविण्यात आले आहेत. तर काही जागांवर उद्यान निर्माण करण्यात आले आहे. वन खात्याच्यावतीने प्रत्येक पावसाळय़ात वृक्षारोपण करण्यात येते. सदर वृक्षारोपण खुल्या जागांवर करून जागेचे संरक्षण करता येऊ शकते. पण मनपाच्या अधिकाऱयांना खुल्या जागांची माहिती नसल्याने मनपाच्या जागांवर पाणी सोडावे लागत आहे. उद्यानासाठी म्हणून राखीव असलेल्या खुल्या जागांवरील फलक रातोरात गायब होण्याचे प्रकार वाढले असून याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या खुल्या जागांचे संरक्षण कोण करणार? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.