भाजप युवा मोर्चाची मागणी; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी / कोल्हापूर
महराष्ट्र लोकसेवा आयोगाने खुल्या व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना स्पर्धा परीक्षासाठी संधीची मर्यादा घातल्याने या प्रवार्गातील विद्यार्थ्यांचे करिअर उद्धवस्त होणार आहे. आयोगाचा निर्णय पूर्णपणे चुकीचा असून खुल्या आणि ओ.बी.सी. प्रवर्गातील उमेदवारांची गळचेपी करणारा आहे. त्यामुळे हा निर्णय तात्काळ मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप युवा मोर्चाने दिला आहे. मागणीचे निवेदन तहसीलदार संतोष कणसे यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, राज्यघटनेच्या प्रस्तावनेत दर्जा व संधीची समानता हा शब्द प्रयोग आहे, मात्र खुल्या आणि ओ.बी.सी प्रवर्गातील समाजावर संधीची मर्यादा घातल्याने राज्यघटनेतील या शब्दप्रयोगाचा शासनाला विसर पडल्याचे दिसून येत आहे.परीक्षा देण्यासाठी संधीची मर्यादा आल्यामुळे उमेदवार तणावाखाली येतील. आत्मविश्वासाने ते परीक्षेला सामोरे जाऊ शकणार नाहीत.
या निर्णयामुळे परीक्षार्थींच्या संख्येमध्ये घट होणार असून यामुळे परीक्षेची गुणवत्ता ढासळणार आहे. तसेच खुल्या आणि ओ.बी.सी. प्रवर्गातील उमेदवारांमध्ये परीक्षेबाबतची उदासिनता तयार होणार आहे. आयोगाची ही भूमिका खुल्या, ओ.बी.सी. प्रवर्गातील समाजाला शैक्षणिक आणि शासकीय नोकरीत मागे खेचणारी आहे. त्यामुळे मराठा व इतर समाजातील उमेदवारांचे भविष्य धोक्यात येणार आहे.
परीक्षेसाठी वयाची मर्यादा असताना हा निर्णय उमेदवारांवर लादला जात आहे. यावरुन राज्य सरकार आणि आयोगाचा मनमानी कारभार सुरु असल्याचे निदर्शनास येत आहे. सरकारचा हा आंधळा कारभार खपवून घेतला जाणार नाही. तरी निर्णय तात्काळ मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विजयसिंह खाडे – पाटील, प्रदेश सदस्य विराज चिखलीकर, संघटन महासचिव विवेक वोरा, सरचिटणीस गिरीष साळोखे, उपाध्यक्ष वल्लभ देसाई आदी उपस्थित होते.