ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. भारतात सुध्दा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. हे संकट रोखण्यासाठी देशभरात लॉक डाऊन जारी करण्यात आला आहे. लॉक डाऊन मध्ये संपूर्ण व्यवहार, शहरे बंद आहेत यातच आता मोबाईल कंपन्यांनी प्रिपेड ग्राहकांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
लॉक डाऊनच्या काळात आपले ग्राहक टिकून राहावेत यासाठी कंपन्या प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जर तुमच्याकडे प्रिपेड सिमकार्ड असेल आणि त्या सिमकार्डाची वैधता संपणार असेल तर मोबाईल कंपन्याच त्याची काळजी घेणार आहेत. म्हणजेच लॉक डाऊनच्या काळात रिचार्ज संपले तरी त्या कार्डाची इनकमिंग सेवा सुरू ठेवणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भारती एअरटेलने निवेदनात म्हटले आहे की अनेक ग्राहकांनी डिजिटल वाहन्यांनव्यक्तिरिक्त कंपनीद्वारे ए. टी. एम., टपाल कार्यालय, किराणा दुकान, मेडिकल स्टोअर्स मध्ये केलेल्या व्यवस्थेतून रिचार्ज केले आहे. परंतु लॉक डाऊनमुळे तीन कोटी ग्राहक रिचार्ज करू शकले नाही त्यामुळे त्यांच्या सिमकार्डाची वैधता 3 मे पर्यंत रहाणार आहे.
तर व्होडाफोन आयडियाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की लॉक डाऊनच्या काळातही ग्राहक कनेक्ट रहावेत म्हणून आम्ही 9 कोटी ग्राहकांना येत्या 3 मे पर्यंत सेवा देत आहोत. या कालावधीत या ग्राहकांची इनकमिंग सेवा सुरू रहाणार आहे. असे म्हटले आहे.