बेळगावातील विविध संघटनांतर्फे मोर्चा काढून निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
मुलगा गतिमंद जन्मला म्हणून पत्नीसह मुलाला मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता. त्यानंतर पत्नीने पतीपासून पोटगीसाठी दावा दाखल केला. तो निकाल पत्नीच्या बाजूने लागल्यानंतर पत्नीशी समजोता करून त्यांना सासरी नेवून पत्नीचा आणि मुलाचा खून करण्याची धक्कादायक घटना गुलबर्गा येथे घडली. या घटनेनंतर तिच्या माहेरच्यांनी तक्रार दिली. मात्र पोलिसांनी कारवाई केली नाही म्हणून बेळगावातील विविध दलित संघटनांबरोबरच इतर सर्वच संघटनांनी भव्य मोर्चा काढून पतीसह सासरच्या मंडळींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
गणेशपूर येथील सुचित्रा हिचा विवाह मुधोळ येथील जगदीश कांबळे याच्याबरोबर झाला. जगदीश हा बँकमध्ये व्यवस्थापक म्हणून नोकरी करत होता. त्याचे एका महिलेशीही अनैतिक संबंध होते. त्यामुळे सुचित्रा हिला नेहमीच त्रास करत होता. सुचित्रा हिला विनीत हा मुलगा होता. तो गतिमंद होता. त्यामुळे पती जगदीश हा नेहमीच सुचित्रा हिला मुलाला सोडून दे असे सांगत होता. मात्र कसाही असू दे तो माझा मुलगा आहे. वाटल्यास मी तुम्हाला सोडीन पण मुलाला सोडणार नाही, असे सुनावले. त्यानंतर जगदीश याने सुचित्रा आणि तिच्या मुलाला त्रास दिला. त्यामुळे सुचित्राने त्याच्या विरोधात कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला. त्या ठिकाणी न्यायालयाने जगदीश याचे अर्धे वेतन देण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे हताश झालेल्या जगदीश याने सुचित्रा आणि तिच्या कुटुंबीयांशी गोड बोलून काही दिवसांपूर्वी तिला नेले होते. गुलबर्गा येथे ते राहत होते. मात्र चार दिवसांपूर्वी त्याने सुचित्रा हिच्या कुटुंबीयांना तुमच्या मुलीने आणि मुलाने आत्महत्या केल्याचे सांगितले.
सदर घटना ऐकल्यानंतर सुचित्रा हिचे आई-वडील व नातेवाईक गुलबर्गा येथे गेले. त्यांनी पाहिले असता दोन्ही मृतदेहांचे पाय जमिनीवरच टेकले होते. त्यामुळे त्यांचा खून करण्यात आल्याचे दिसून आले. त्या विरोधात पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. मात्र पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यामुळे येथील विविध दलित संघटना, रयत संघटना, श्रीराम सेना हिंदुस्थान, कामगार संघटना यासह इतर संघटनांनी हा मोर्चा काढला.
यावेळी जोरदार घोषणाबाजी देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. मल्लेश चौगुले, जयश्री चलवादी, रमाकांत कोंडुस्कर, दुर्गेश मेत्री, सिद्धगौडा मोदगी, शिवरायाप्पा जोगीन, मोहन कांबळे, बसवराज शैगोळ, अमोल देसाई, डॉ. लक्ष्मण बक्काई यांच्यासह मोठय़ा संख्येने महिलांनी व विविध संघटनांच्या पदाधिकाऱयांनी या मोर्चात सहभाग घेतला होता.