महिलांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन : आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
अल्पवयीन मुलीशी विवाह केल्यानंतर तिला पतीसह सासरच्यांनी शारीरिक व मानसिक त्रास करून तिचा खून केला. मात्र, ते प्रकरण दडपण्यात आले असून प्रकरणाची चौकशी करावी आणि आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन
दिले.
हाग्गेदाळ (ता. हुक्केरी) येथील अल्पवयीन मुलीचा विवाह हुदली येथील तरुणाशी झाला होता. त्यानंतर हुदली येथे राहत असताना तिच्या सासरच्यांनी तिचा खून केला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
असे असताना पोलिसांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली
आहे.
महिला-बाल कल्याण खात्याने पुढे यावे
जिह्यामध्ये मोठय़ा प्रमाणात बालविवाह होत असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. महिला व अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार होत आहेत. तेव्हा असे प्रकार टाळण्यासाठी महिला आणि बाल कल्याण खात्याने तसेच पोलीस प्रशासनाने पुढे येण्याची गरज आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी सुशीला व्ही., शिवक्का, नागव्वा, मलप्रभा, लक्ष्मण पुजार यांच्यासह महिला उपस्थित होत्या.