प्रतिनिधी/ बेळगाव
अनैतिक संबंधातून एका तरुणाचा खून करुन पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकून देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. 25 दिवसानंतर खुनाचा हा प्रकार उघडकीस आला असून रेल्वे पोलिसांनी शुक्रवारी तिघा जणांना अटक केली आहे.
बसवराज उर्फ बस्या यल्लाप्पा नायक (वय 40, रा. बेडरहट्टी, ता. खानापूर), शंकर चन्नबसाप्पा जकराय (वय 25, रा. गंदीगवाड, ता. खानापूर), मल्लेश यल्लाप्पा पुजारी (वय 20, रा. मल्लमर्डी, ता. गोकाक) अशी त्यांची नावे आहेत. शुक्रवारी रात्री सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करुन त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
रेल्वेचे पोलीस प्रमुख डॉ. बोरलिंगय्या, रेल्वे पोलीस विभागाचे उपअधिक्षक बी. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मंडल पोलीस निरीक्षक जे. एम. कालिमीर्ची, बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक टी. रमेश, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रमेश, बी. बी. बंडीवड्डर, मंजुनाथ राव, आय. बी. कलकेरी, प्रभू गोणे, संगाप्पा कोटय़ाळ, शंकरानंद पुजेरी, मंजुनाथ रायकोप्प आदींनी ही कारवाई केली आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इदलहोंड रेल्वे स्थानकाजवळ 14 फेब्रुवारी रोजी रेल्वे रुळावर अनोळखीचा मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीलाच पोलिसांनी संशयास्पद मृत्यू प्रकरण अशी या प्रकरणाची नोंद केली होती. दोन दिवसांत मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. गुरु उर्फ करीअप्पा यल्लाप्पा नायक (वय 30, रा. बेडरहट्टी) असे त्याचे नाव असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले.
पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधून बेळगावला बोलावून घेतले. गेल्या 10 ते 12 वर्षांपासून गुरु हा आपल्या घरात नव्हता. तो बाहेरच फिरत होता. त्यामुळे त्याच्याशी आपला काही संबंध नाही, अशी भूमिका सुरुवातीला कुटुंबियांनी घेतली होती. मात्र चौकशीअंती गुरुचा मोठा भाऊ बसवराज नायक याच्या पत्नीबरोबर त्याचे अनैतिक संबंध होते, असे उघडकीस आले.
गेल्या बारा वर्षांपूर्वी गुरु हा बसवराजची पत्नी व तिच्या मुलांसमवेत गावातून बाहेर पडला होता. 13 फेब्रुवारी रोजी तो गावात परत आला त्यावेळी त्याच्या भावाने पत्नीला पळविल्याच्या रागातून त्याच दिवशी त्याचा खून करुन पुरावे नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर टाकुन दिल्याचे उघडकीस आले आहे. वरि÷ अधिकाऱयांनी या कारवाईचे कौतुक केले आहे.