जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल, राजारामपुरी येथील खून प्रकरण
प्रतिनिधी/कोल्हापूर
भावजयीसोबत सुरु असलेल्या भांडणामध्ये मध्यस्थी केल्याच्या रागातून चाकूने भोसकून खून केल्या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. 2 बी. डी. शेळके यांनी वृद्धास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रसन्न उर्फ बाळू उर्फ बळी सज्जन साठे (वय 50 रा. मातंग वसाहत, राजारामपुरी) असे आरोपीचे नांव आहे. सरकारी वकील म्हणून अॅड. अमित आनंदराव महाडेश्वर यांनी काम पाहिले. 21 एप्रिल 2018 रोजी मातंग वसाहत, राजारामपुरी येथे ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, 21 एप्रिल 2018 रोजी प्रसन्न उर्फ बाळू उर्फ बळी सज्जन साठे याची भावजय मंगल साठे यांच्यासोबत मातंग वसाहत येथील घरामध्ये वाद सुरु होता. यावेळी गल्लीत राहणारा संदीप सखाराम बेरड हा भांडणाचा आवाज ऐकून तेथे आला. त्याने भांडणामध्ये मध्यस्थी करुन वाद मिटवण्याच्या प्रयत्न केला. मात्र प्रसन्न साठे याने घरातील चाकूने संदीप बेरडच्या पोटात चाकू भोकसला. यानंतर प्रसन्न साठे याने घटनास्थळावरुन पळ काढला. पळून जात असताना त्याने चाकू घराच्या छपरावरती फेकून दिला. दरम्यान गल्लीतील नागरिकांनी संदीप बेरड यास जखमी अवस्थेत सिपीआर रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना संदीपचा मृत्यू झाला. यानंतर प्रसन्न साठे याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबतची फिर्याद सागर अवघडे यांनी दिली. पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांनी या घटनेचा तपास केला. तर पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी प्रसन्न साठे याच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. 2 बी. डी. शेळके यांच्यासमोर झाली. सरकारी वकील अॅड. अमित महाडेश्वर यांनी 17 साक्षीदार तपासले. यापैकी मंगल साठे, आश्विनी साठे या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितुर झाल्या. मात्र अन्य साक्षीदार, परिस्थीतीजन्य पुरावे, वैज्ञानिक प्रयोगशाळेचा पुरावा, वैद्यकीय अधिकारी यांचा पुरावा यांच्यासह सरकारी वकील अॅड. अमित महाडेश्वर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून जिल्हा व सत्र न्यायाधीश क्र. 2 बी. डी. शेळके यांनी प्रसन्न उर्फ बाळू उर्फ बळी सज्जन साठे यास दोषी ठरवत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच 5 हजार रुपये दंडाची शिक्षाही सुनावली.
या खटल्यामध्ये अॅड. गजानन कोरे, अॅड. प्रशांत कांबळे, पैरवी अधिकारी पोलीस नाईक अशोक शिंगे यांचे विशेष सहकार्य लाभले.