प्रतिनिधी/ खेड, रत्नागिरी
चीनमधील कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे पूर्ण जग धास्तीत आहे. चीनमधील हिंदू प्रांतातील नानटोग विद्यापीठात खेड तालुक्यातील 3 विद्यार्थिनी वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. त्या तिथे सुरक्षित असून त्यांच्याकडे जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी या विद्यार्थिंनीपैकी सादिया बशीर मुजावर (खेड) हिच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला असता ही माहिती दिली. खेडमधील सुमेना मुनीर हमदुले, झोया महवाश हमदुले (शिर्शी) आणि सादिया बशीर मुजावर या तीन विद्यार्थिनी शिक्षणासाठी चीनमध्ये राहत आहेत. सध्या त्यांच्या सुट्टय़ांचा कालावधी आहे. या सुट्टय़ा 23 फेब्रुवारीपर्यंत राहणार आहेत. चीनमधील कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे कुणालाही घराबाहेर जाण्याची मुभा दिलेली नाही. त्यामुळे या तिघीजणी घरातच आहेत.
या बाबत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दूरध्वनीवर गुरूवारी रात्री 10 च्या सुमारास संपर्क साधत त्यांची परिस्थिती जाणून घेतली. त्यांना लवकरात-लवकर भारतात आणण्याच्या दृष्टीने चीनमधील भारतीय दूतावासासोबत आपण पत्रव्यवहार करू, असे जिल्हाधिकाऱयांनी त्या तिघींना सांगून आश्वस्त केले. तीनही विद्यार्थिनी सुखरूप असून त्यांना परत मायदेशी आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू झाले असल्याचे उपविभागीय अधिकारी सोनोने यांनीही सांगितले.
रूग्ण संख्या न वाढण्यासाठी खबरदारी
कोराना व्हायरसचे काही संशयित रूग्ण आता महाराष्ट्रातही आढळल्याने राज्याचा आरोग्य विभाग धास्तावला असून रूग्ण संख्या वाढू नये, यासाठी शुक्रवारी दुपारी मॅरेथॉन व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली. या कॉन्फरन्सव्दारे एकाचवेळी राज्यातील सर्व जिल्हा शल्य चिकित्सकांशी संवाद साधला. कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे, त्यासाठी आरोग्य यंत्रणा कशी सज्ज झाली पाहिजे, यासाठी आरोग्यमंत्र्यांसह संचालकांनी संवाद साधला. यावेळी रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सकांनी रत्नागिरी जिल्हय़ाविषयी माहिती दिली.