मृत्यूचे गूढ कायम, सलग तिसऱया घटनेने पोलीस चक्रावले
प्रतिनिधी/ खेड
चिंचघर-नारिंगी नदीजवळ एका विवाहितेपाठोपाठ 42 वर्षिय प्रौढाने विष प्राशनाने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी दुपारच्या सुमारास मल्लाप्पा शांताप्पा वडियार (45, मूळगाव सामनळ, जि. यादगिर, सध्या-नारिंगी नदीजवळ खेड) या वीटभट्टी कामगाराचा मृत्यू झाला. मृत्यूचे गूढ कायम असून याठिकाणी झालेल्या सलग तिसऱया घटनेने पोलीसही चक्रावले आहेत. वीटभट्टी कामगाराच्या मृत्यूचे गूढ उकलण्याचे नवे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
नारिंगी नदीजवळच सासऱयाच्या मानसिक छळाला कंटाळून यापूर्वी रूपाली मंगेश पवार या 20 वर्षिय विवाहितेने विष प्राशनाने आत्महत्या केली होती. सुनेने केलेल्या आत्महत्येचा उलगडा होईल या भीतीपोटी हरेश पवार या 42 वर्षिय सासऱयानेही विष प्राशन करून आत्महत्या केली. सासऱयाच्या आत्महत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले होते. यापाठोपाठ आता मल्लाप्पा वडियार याचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
1 मे रोजी पहाटेच्या सुमारास मल्लाप्पा वडियार झोपेतच मोठमोठय़ाने ओरडू लागला. त्याच्या ओरडण्याने जाग आलेल्या शरणाप्पा लकाप्पा हरवाळ याने तत्काळ तेथे धाव घेतली. यादरम्यान मल्लाप्पा मोठमोठय़ाने श्वास घेण्याचा प्रयत्न करत असताना त्याला अडथळा निर्माण होत होता. त्यास तातडीने कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱयांनी त्यास मृत घोषित केले. या सलग घडलेल्या घटनांनी पोलीसही चक्रावून गेले आहेत. याबाबतचा अधिक तपास येथील पोलीस करत आहेत.