प्रतिनिधी/ खेड
मुंबई-गोवा महामार्गावरील बोरज ओढय़ानजीक दोन जनावरांची कत्तल केल्याचा घृणास्पद प्रकार सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आला. गोवंशातील दोन जनावरांमध्ये गाय की बैल होते याचा उलगडा झालेला नाही. दोन वर्षानंतर तालुक्यात गोवंशहत्येची पुनरावृत्ती झाल्याने तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणाचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे.
दोन वर्षापूर्वीही लोटे येथे गोहत्येनंतर ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक होऊन आंदोलकांनी महामार्ग रोखून धरत पोलीस अधिकाऱयांसह कर्मचाऱयांवर हल्ला केला होता. पोलिसांची व्हॅनही पेटवली होती. यातील असंख्य आंदोलकांना पोलिसांनी अटक करतानाच गोहत्या प्रकरणातील आरोपींच्याही मुसक्या आवळल्या होत्या. यात लोटे औद्योगिक वसाहतीत तणाव निर्माण झाला होता. शिवाय अनेक आंदोलक कित्येक महिने पसार होते. याची पुनरावृत्ती बोरज येथे झाल्याने खळबळ उडाली आहे.
रविवारी रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी दोन जनावरांची कत्तल केल्याचा प्रकार सोमवारी सकाळच्या सुमारास ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आले. पोलीस अधिकाऱयांनीही तत्काळ घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. या हत्येमध्ये गाय की बैल याचा उलगडा करण्याचेही आव्हान पोलिसांसमोर आहे.
बोरजनजीकच्या ओढय़ाजवळ दोन जनावरांची कत्तल केल्याची बाब कर्णोपकर्णी पसरताच ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. या घटनेने पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका जनावराच्या कानातील बॅच पोलिसांच्या हाती लागला आहे. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
या घृणास्पद प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. गावात तेढ निर्माण करण्यासाठी गोहत्या घडवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, ग्रामस्थांनी शांतता व संयम बाळगून पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.