प्रतिनिधी/ खेड
तालुक्यात पाणीटंचाई दिवसेंदिवस कहर करत असून पाणीटंचाईच्या भीषण चटक्यांनी ग्रामस्थ अक्षरशः हवालदिल झाले आहेत. गाव-वाडय़ांची संख्या झपाटय़ाने वाढत असल्याने प्रशासनही मेटाकुटीसच आले आहे. तालुक्यातील 19 गावे 36 वाडय़ांना एका शासकीय व 6 खासगी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
तहानलेल्या गाव-वाडय़ांना चोरद नदीपात्रातून एकदिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत असून लाखो लिटर पाण्याचा उपसा होत आहे. सर्वाधिक पाणीटंचाईची झळ धनगरवाडय़ांना बसत असून ग्रामस्थ रडकुंडीस आले आहेत. उन्हाच्या काहिलीने ग्रामस्थांना घाम फुटत असून कोरोनाच्या सावटामुळेही ग्रामस्थ चिंतेत आहेत. या चिंतेत पाणीटंचाईची भर पडली असून पाण्यासाठी वणवण भटकंती करून मिळणाऱया जेमतेम पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाही अवघा दिवस पाण्यासाठी वेचावा लागत असल्याने शेतीच्या मशागतीची कामे उरकायची कधी, या विवंचनेत शेतकरी आहेत. तहानलेल्या गाव-वाडय़ांची सारी मदार प्रशासनाच्या टँकरवरच अवलंबून आहे.
चारच दिवसांपूर्वी टंचाईग्रस्त गाव-वाडय़ांना अर्धशतक पार करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. सद्यस्थितीत 19 गावे 36 वाडय़ांना 7 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. प्रशासनाच्या ताफ्यात 6 खासगी टँकर असून टंचाईग्रस्त गाव-वाडय़ांपाठोपाठ टँकरच्या विक्रमाचीही नोंद झाली आहे. उपलब्ध जलस्त्रोत कोरडे पडत चालल्याने दिवसागणिक गाव-वाडय़ांची संख्याही झपाटय़ाने वाढत आहे. टंचाईग्रस्त गाव-वाडय़ांची तहान भागवताना प्रशासनाची चांगलीच दमछाक होत आहे. या गाव-वाडय़ांचे पाण्यावाचून हाल होणार नाहीत, याकडे पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी विशेष लक्ष ठेवून आहेत.