प्रतिनिधी/ सातारा
एकेकाळी कायदा व सुव्यवस्था बासणात गुंडाळणाऱया प्रतापसिंह नगरमध्ये अनेकदा जलद कृती दल, एसआरपीच्या तुकडय़ा पाचारण कराव्या लागत होत्या. वरिष्ठ पोलीस अधिकार्यांना संचलन करावे लागत होते. मात्र कोरोनाच्या काळात संपूर्ण खेडवासियांनी आपल्या चांगल्या गुणांचाही अनुभव जिल्हा प्रशासन व पोलिसांना करुन दिला आहे. सातारा जे शहरवासियांना जमले नाही, ते ’?ेड’ ने करुन दाखवल्यामुळे सर्वांच्यादृष्टीने ते खेडवासिय कौतुकाचा विषय ठरले आहेत.
एकीकडे श्रीमंतीचा महापूर, तर दुसऱया बाजूला प्रतापसिंनगरात गरिबीचा सुकाळ खेडच्या नशिबी आला आहे. 200 ते 250 गृहनिर्माण संस्था, त्याच्या दुप्पट अलिशान बंगले, कष्टकरी, मजूर, भंगार व्यवसायिक यांनी प्रतापसिंह नगर म्हणून नवीन वसाहत निर्माण केली. याठिकाणी नागरी सुविधांचा पूर्वी अभाव होता. परंतू सध्या खेड ग्रामपंचायतीचे सरपंच विजय शिंदे, पिंटू गायकवाड, मिलिंद कदम, सुजित पवार व कामेश कांबळे या तरुणांनी ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेषत: कोरोना संकटात येथील नागरिकांना चांगल्या सुविधा देवून कोरोनाला थोपवले आहे.
6 एप्रिलला कॅलिफोर्नियातून आलेल्या पहिल्या कोरोनाबाधिताचा बळी गेला. त्यानंतर 3 जुलै रोजी रेल्वे पोलीस, तर 16 जुलैला भुईंज पोलीस स्टेशनचे कर्मचारी कोरोनाबाधित म्हणून खेड हद्दीत सापडले. याची गंभीर दखल घेवून तातडीने संपूर्ण खेडमध्ये घरोघरी जावून खेड ग्रामपंचायतीने निर्जंतुकीकरण पाचवेळा केले. तसेच प्रत्येक कुटूंबाला सॅनिटायझर व आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यात आले. खेड व प्रतापसिंहनगरमधील लोकांनी उदरनिर्वाहाचे साधन नसतानाही घराबाहेर पडताना शासनाने दिलेल्या नियमांचे पालन केले आहे.
घरोघरी जावून आरोग्याची तपासणी करणाऱया 17 आशा व 30 अंगणवाडी सेविका आणि भरारी पथकाला रहिवाशांनी सहकार्य केले. रहिवाशांनी सत्य माहिती दिल्यामुळे उणीवा दूर करण्यास मदत झाली आहे. बाहेरुन येणाऱया व्यक्तीचे विलगीकरण करण्यात येत असल्याने कोणालाही बाधा झालेली नाही. ग्रामविकास अधिकारी डी. डी. गायकवाड हे सर्व सूचनांचे पालन करण्यासाठी जागरुक आहेत. येथील ज्येष्ठ नागरिकांनीही काळजी घेवून इतरांनाही मार्गदर्शन करण्याची भूमिका घेतली आहे. कष्टकरी समाज असल्यामुळे येथील स्थानिकांची प्रतिकारशक्ती उत्तम आहे, हेही महत्त्वाचे कारण असल्याचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंतराव ओव्हाळ यांनी सांगितले आहे.