ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
दिल्ली-जयपूर महामार्गावरील खेडा सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात आज भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत पोहचले. कृषी कायद्यातील बदलांवर सरकार चर्चा करण्यास तयार आहे. मात्र, शेतकऱ्यांना ते मान्य नाही. तिन्ही कृषी कायदे रद्द झाल्याशिवाय शेतकरी मागे हटणार नाहीत. त्यामुळे पुढील 35 महिने शेतकऱ्यांचे हे आंदोलन सुरूच राहील, असे टिकैत यांनी सांगितले.
टिकैत म्हणाले, शेतकरी कोणत्याही परिस्थितीत घाबरणारे नाहीत. कृषी कायद्यांविरोधातील लढा ते सुरूच ठेवतील. सीमेवरील आंदोलनस्थळी शेतकऱ्यांची संख्या कमी असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, रणनीतीनुसार हे केले जात आहे. सरकारला शेतकऱ्यांची ताकद बघायची असेल तर पुन्हा एकदा 5 लाख ट्रॅक्टर दिल्लीला पोहोचतील.