प्रतिनिधी/ चिपळूण
खेर्डी नळपाणी योजना प्रकरणात आपल्यासह पत्नी, अधिकारी यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे खोटे आहेत. पोलिसांनी कोणतीही तपासणी न करता राजकीय दबावाखाली कारवाई केली आहे. त्यामुळे या प्रकरणात कायदेशीर बाबी तपासून मगच पुढील पावले उचलू, अशी माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
ते पुढे म्हणाले की, गेली 30 वर्षे आपण समाजकारणाबरोबरच राजकारणात आहे. त्यातच खेर्डी ग्रामपंचायतीमध्ये 15 वर्षे आपल्या पॅनलची निर्विवाद सत्ता आहे. माजी पालकमंत्री व रायगडचे खासदार सुनील तटकरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम यांच्या सहकार्याच्या जोरावर आपण खेर्डीत विकासकामे केली. विकासकामे करताना वारंवार आपल्याला खोटय़ा गुन्हय़ांना समोर जावे लागले. ग्रामपंचायत इमारत बांधकामातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आता पाणी योजनेच्या कामात आपल्यासह पत्नी जयश्री खताते व अधिकाऱयांवर खोटे गुन्हे दाखल केले गेले आहेत. त्यामुळे खोटय़ा तक्रारींचा सिलसिला आजही कायम आहे. मात्र खेर्डीच्या विकासासाठी असे कितीही गुन्हे माझ्यावर दाखल झाले तरी आपण गावच्या विकासाचे प्रयत्न सोडणार नाही.
मुळातच अप्पा दाभोळकर यांच्या नावाने तक्रार असली तरी ते माझे चांगले मित्र आहेत. मात्र त्यांना तक्रारीचा छंद आहे. पोलीस म्हणून दापोली, गुहागर, खेडमध्ये काम करीत असताना त्यांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. स्वत:च्या नातेवाईकांनाही त्यांनी सोडलेले नाही. मुळातच ज्या रस्त्याप्रकरणी तक्रार केली त्यामध्ये त्यांनी बेकायदेशीर उत्खनन, दगडाची चोरी केली असल्याचे नमूद केले आहे. महसूलचा कोणताही पंचनामा झालेला नसताना पोलिसांनीही वस्तूस्थिती न तपासता गुन्हा दाखल केला आहे. चौकशीदरम्यान मला जबाब देण्यासाठी बोलावले, मात्र जबाबच घेतला गेलेला नाही. कोणाच्यातरी दबावाखाली येऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. मोठय़ा कष्टानंतर खेर्डीसाठी मोठी पाणी योजना मंजूर झाली आहे. सुमारे 20 हजार लोकवस्तीचा विचार करून योजना आकार घेत आहे. त्यामुळे गुन्हे दाखल झाले असले तरी आपण यासंदर्भात आता कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब करणार असल्याचे सांगितले. यावेळी माजी सरपंच रवींद्र दाते, विनोद भुरण उपस्थित होते.