वेटलिफ्टर मिराबाई चानूबाबत राष्ट्रीय फेडरेशनचा अजब ‘पराक्रम’
नवी दिल्ली :
मिराबाई चानू ही भारताची आघाडीची वेटलिफ्टर यापूर्वीच खेलरत्न या सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने सन्मानित झालेली आहे. पण, यानंतरही भारतीय वेटलिफ्टिंग फेडरेशनने यंदा तिची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. वेटलिफ्टिंग फेडरेशनने यावेळी चानूसह वेंकट राहुल व पूनम यादव यांचीही शिफारस केली आहे. अर्जुन पुरस्कारही प्रतिष्ठेचा आहे. त्यामुळे, तो बहाल झाला तर मला आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया चानूने दिली.
यापूर्वी 2018 मध्ये चानूला भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या साथीने खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले. त्याच वर्षी तिला देशातील चौथ्या क्रमांकाच्या पद्मश्री पुरस्काराने देखील गौरवले गेले. 2017 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकणाऱया 25 वर्षीय चानूची 2018 मध्ये अर्जुन पुरस्कार व खेलरत्न पुरस्कार या दोन्हीसाठी शिफारस झाली होती. पाठदुखीमुळे काही काळ बाहेर रहावे लागल्याने 2018 मध्ये चानूच्या प्रगतीवर परिणाम झाला. पण, 2019 मध्ये तिने पुन्हा फॉर्म मिळवला.