पुरस्काराच्या नावात बदल – राजीव गांधी यांचे नाव हटवले – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्यासाठी देशवासियांकडून अनेक विनंत्या आल्या होत्या. त्यांच्या भावनांचा आदर करत खेलरत्न पुरस्काराला आता ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ असे संबोधले जाणार आहे.
– पंतप्रधान नरेंद मोदी
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतीय खेळाडूंना देण्यात येणाऱया मानाच्या राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च क्रीडा पुरस्काराचे नाव आता बदलण्यात आले असून आता ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ या नावाने हा पुरस्कार ओळखला जाणार आहे. याबाबतची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी ट्विटरवरून केली. खेलरत्न पुरस्काराच्या नावात केंद्र सरकारकडून बदल करण्यात आला आहे. आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावाने हा पुरस्कार ओळखला जाणार असल्याचे ट्विट पंतप्रधानांनी केले आहे.
मेजर ध्यानचंद यांच्या नावाने खेलरत्न पुरस्काराचे नाव करण्यासाठी माझ्याकडे देशभरातील अनेक नागरिकांनी विनंती केली होती. त्यांच्या विनंतीसाठी धन्यवाद. त्यांच्या भावनांचा आदर करत आजपासून खेलरत्न पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असे असेल, अशी घोषणा पंतप्रधानांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. मेजर ध्यानचंद यांचा भारताच्या खेळाच्या क्षेत्रात जागतिक स्तरावर आदर आणि अभिमान मिळवून देण्यामध्ये मोठा वाटा असल्यामुळे खेलरत्न पुरस्काराला त्यांचे नाव देण्याचा निर्णय हा त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान असेल, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. मात्र, अद्याप त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आलेले नाही. तथापि त्यांचा जन्मदिवस भारतात राष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो. 29 ऑगस्टला त्यांची जयंती असते. खेलरत्न पुरस्कारांची सुरुवात 1991-92 मध्ये करण्यात आली होती.
मेजर ध्यानचंद- हॉकीचे जादूगार
मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हटले जाते. भारतीय हॉकीमध्ये त्यांचे फार मोठे योगदान राहिले आहे. त्यांनी त्यांच्या अखेरच्या ऑलम्पिकमध्ये 13 गोल केले होते. ध्यानचंद यांनी भारताला सलग तीन ऑलम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाला सुवर्णपदक मिळवून दिले होते.
काँग्रेसकडून सावध टीकास्त्र
दरम्यान, खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्यावरुन काँग्रेसने पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. भाजपला देशाचे भगवाकरण करायचे असल्यामुळेच त्यांनी या पुरस्काराचे नाव बदलल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार सुरेश यांनी केला आहे. भाजप आणि संघाने नेहमीच नेहरु-गांधी घराण्याचा तिरस्कार केला आहे. या तिरस्काराच्या मानसिकतेतूनच त्यांच्या नावाने असलेल्या योजना, प्रकल्पाची नावे बदलण्याचे काम मोदी सरकार करत आहे, अशी टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तर, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी मोदींनी कितीही प्रयत्न केला तरी राजीवजींचे स्थान हलणार नाही. मेजर ध्यानचंद अमर रहे! राजीव गांधी अमर रहे!’, असा खोचक टोला त्यांनी मारला आहे.