वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱया खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेचे गुलमर्ग येथे शुक्रवारी उद्घाटन केले. जम्मू-काश्मिरला हिवाळी खेळांचे प्रमुख केंद बनविण्याच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
27 राज्य व केंद्रशासित प्रदेशातील 1200 क्रीडापटू या स्पर्धेत सहभागी झाले असून 2 मार्च रोजी या स्पर्धेची सांगता होणार आहे. ‘आंतरराष्ट्रीय हिवाळी क्रीडा स्पर्धांत भारताचे आस्तित्व जाणवून देण्याच्या दिशेने तसेच जम्मू-काश्मिरला देशातील हिवाळी खेळांचे केंद्रस्थान बनविण्याच्या दिशेने टाकलेले हे पहिले पाऊल आहे,’ असे ते आभासी संबोधनात म्हणाले. ‘जम्मू-काश्मिर शांती व विकास यामध्ये नवी उंची गाठण्यास उत्सुक असल्याचेच गुलमर्गमधील या स्पर्धेच्या आयोजनाने स्पष्ट होत आहे. एक भारत श्रेष्ठ भारत, या निर्धाराला या स्पर्धेने आणखी बळकटी मिळाली आहे. यावर्षी स्पर्धकांची संख्या दुपटीने वाढल्याचे मला सांगण्यात आले. हिवाळी खेळाकडे देशाचा कल वाढत असल्याचेच हे प्रतिबिंब आहे,’ असेही ते म्हणाले. यावेळी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू स्पर्धेच्या उद्घाटनावेळी उपस्थित होते.