पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन : ‘इंडियन टॉय फेअर’चे उद्घाटन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
खेळण्यांचे प्रदर्शन म्हणजे केवळ मनोरंजनच नाही तर देशातील जुने खेळ आणि संस्कृती, परंपरा मजबूत करण्याचा एक महत्त्वाचा दुवा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी म्हणाले. याचवेळी पंतप्रधानांनी देशातील खेळणी उत्पादकांना ‘आत्मनिर्भर’ बनण्याचे आवाहनही केले. पंतप्रधानांनी शनिवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून इंडिया टॉय फेअर या खेळण्याच्या मोठय़ा प्रदर्शनाचे उद्घाटन केले. देशी खेळण्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केलेले हे प्रदर्शन 4 दिवस चालणार आहे.
देशातील खेळणी उत्पादकांनी पर्यावरणपूरक आणि मानसशास्त्र या दोन्हींसाठी लाभदायक असतील अशा खेळण्यांची निर्मिती करावी. खेळणी बनवताना प्लास्टिकचा वापर कमीत कमी करावा आणि रिसायकल अर्थात पुनर्वापर करता येण्यासारख्या घटकांपासून खेळणी बनवावीत, असे पंतप्रधान म्हणाले. पुनर्वापर हा भारतीय जीवनशैलीचा पूर्वीपासूनच भाग आहे. तेच चित्र आपल्या खेळण्यांमध्येही दिसते. बहुतांश भारतीय खेळणी नैसर्गिक आणि पर्यावरणाशी अनुकूल घटकांपासून तयार केली जातात. त्यात वापरले जाणारे रंगही नैसर्गिक आणि सुरक्षित असतात,’ असेही त्यांनी सांगितले.
भारतीय खेळ आणि खेळणी यांचे वैशिष्टय़ हे असते, की त्यात ज्ञान, विज्ञान, मनोरंजन आणि मनोविज्ञान या सगळय़ा बाबींचा समावेश असतो. आधुनिक युगातला लुडो तेव्हा ‘पच्चिसी’च्या रूपात खेळला जात होता. आपल्या धर्मग्रंथांतही छोटय़ा रामाच्या वेगवेगळय़ा खेळांचे वर्णन आढळते, असे मोदी म्हणाले.
रोजगार, उद्योगवाढीला हातभार
आभासी कार्यक्रमादरम्यान मोदींनी देशभरातील अनेक टॉय क्लस्टरशी संवाद साधला. 200 वर्षांपासून खेळणी बनवणाऱया कर्नाटकातील खेळण्यांचे क्लस्टर चन्नपटना येथे बोलताना मोदींनी भारताच्या खेळणी उद्योगासाठी खेळणी तयार करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन येण्याचे आवाहन केले. खेळणी बनविण्याच्या कामांना गती मिळाल्यास रोजगार निर्मितीबरोबरच उद्योगवाढीच्या प्रयत्नांना मोठा हातभार लागणार असल्याचेही ते म्हणाले.
पालकांनी मुलांसोबत खेळाचा आनंद लुटावा!
पंतप्रधानांनी आपल्या भाषणादरम्यान मुलांना आणि पालकांनाही सतर्क केले. आज अनेक लोक टीव्ही-मोबाईलच्या विळख्यात अडकून पडले आहेत. ‘प्ले टाईम’ची जागा आज ‘स्क्रीन टाईम’ने घेतली आहे. लहान मुलेही आता खेळण्यांकडे दुर्लक्ष करू लागली आहेत. त्यावर मात करण्यासाठी पालकांनीही मुलांसोबत खेळाचा आनंद लुटल्यास दोघेही समाधानी होतील, असे पंतप्रधान म्हणाले.