खेळपट्टीच्या टीकाकारांवर रिचर्ड्सची टीका
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
इंग्लंडच्या आजीमाजी खेळाडूंनी अहमदाबादमधील खेळपट्टीवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टीकेची झोड उठवली असली तरी विंडीजचे महान फलंदाज व्हीव रिचर्ड्स यांनी मात्र खेळपट्टीवरील टीका निरर्थक असल्याचे स्पष्ट प्रतिपादन केले. पाहुण्या इंग्लिश संघाने भारतीय संघाच्या आव्हानाला सामोरे जाण्यापूर्वी पुरेशी तयारी केलेली नाही, असे निरीक्षण त्यांनी येथे नोंदवले.
अहमदाबादमधील मोटेराच्या नव्या खेळपट्टीवर तिसरी कसोटी दोन दिवसांच्या आतच निकाली झाल्यानंतर तेथील खेळपट्टी हा वादाचा मुद्दा ठरला. माजी इंग्लिश कर्णधार मायकल वॉन व ब्रिटीश माध्यमातील काही घटकांनी त्यावेळी कडाडून टीका केली होती. त्याचा रिचर्ड्स यांनी येथे समाचार घेतला.
‘इंग्लंडविरुद्ध दुसऱया, तिसऱया कसोटी सामन्याबाबत मला काही प्रश्न विचारले गेले. पण, मुळात या प्रश्नामुळेच गोंधळून जावे, अशी स्थिती आहे. भारतात खेळत असताना अव्वल फिरकी गोलंदाजांचा सामना करावाच लागतो आणि याची कल्पना असतानाही इंग्लंडने पुरेशी तयारी केली नाही, हेच निदर्शनास येते. टेस्ट मॅच याचा अर्थच असा होतो की, या प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्व खेळाडूंचा कस लागतो. जर फिरकीला पोषक खेळपट्टीवर खेळण्यासाठी त्या प्रदेशात जात असाल तर त्याचा बीमोड करण्यासाठी तुमची तयारी असायला हवी’, असे 68 वर्षीय रिचर्ड्स म्हणाले.
‘इंग्लंडचा संघ पहिल्या कसोटी सामन्यातील दणकेबाज विजयानंतर कम्फर्ट झोनमध्ये होता. पण, नंतर त्यांना भारताने त्यांच्या कम्पर्ट झोनमधून बाहेर काढले. फिरकी गोलंदाजी हा देखील खेळाचा एक भाग असतो, हे इंग्लंडने जाणून घ्यायला हवे’, असे त्यांनी शेवटी नमूद केले.
सध्या सुरु असलेल्या या मालिकेत कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला चेन्नईतील पहिली कसोटी 227 धावांनी गमवावी लागली होती. पण, नंतर दुसऱया कसोटीत त्यांनी 317 धावांनी एकतर्फी विजय संपादन केला तर तिसऱया कसोटीत 10 गडी राखून विजय मिळवत मालिकेत 2-1 फरकाने आघाडी घेतली. मोटेराच्या आव्हानात्मक खेळपट्टीवर भारतीय संघाने इंग्लंडचे दोन डाव अवघ्या 112 व 81 धावांमध्येच गुंडाळले.
सध्या 2-1 अशा फरकाने आघाडीवर असलेला भारतीय संघ चौथ्या कसोटीत जसप्रित बुमराहशिवाय मैदानात उतरेल. बुमराहने केलेल्या विनंतीनुसार, संघव्यवस्थापनाने त्याला या लढतीतून विश्रांती दिली.
भारतीय क्रिकेट संघाचा कसून सराव, पुढील कसोटी गुरुवारपासून
इंग्लंडविरुद्ध चौथ्या व शेवटच्या कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर, विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे यांनी सोमवारी कसून सराव केला. उभय संघातील चौथी गुरुवार दि. 4 पासून खेळवली जाणार आहे. बीसीसीआयने ट्वीटरवर संघाच्या सरावाचा एक व्हीडिओ पोस्ट केला. येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर कोहली, रोहित व रहाणे हे तिन्ही वरिष्ठ फलंदाज ड्राईव्ह, पूल, फ्लिकचे फटके घोटवताना दिसून आले.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्राr यांनी या सरावादरम्यान फलंदाजांना सूचना केल्या व सरावानंतर रोहित, कोहली यांच्याबरोबर त्यांनी चर्चाही केली. तिसऱया कसोटीत गुलाबी चेंडूवर सामन्यात 11 बळी घेणाऱया अक्षर पटेलने देखील गोलंदाजीचा सराव केला. रहाणे, रोहित यांनी स्लीपमध्ये एकहाती झेलचाही सराव घेतला.