लखनऊ/प्रतिनिधी
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे रविवारी झालेल्या हिंसाचारात १९ वर्षीय शेतकऱ्याचाही मृत्यू झाला. मृत्यूशी लढत असतांना लव्हप्रीत सिंगने त्याच्या वडिलांना हॉस्पिटलमधून फोन केला होता आणि लवकर येण्याची विनंती केली. मात्र, कुटुंब पोहोचले तोपर्यंत खूप उशीर झाला होता. लव्हप्रीत सिंगचा मृत्यू झाला होता. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या रविवारी भेटीदरम्यान झालेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात लव्हप्रीत आणि इतर तीन शेतकऱ्यांचा समावेश असलेल्या ९ जणांमध्ये मृत्यू झाला आहे. यावर शेतकरी नेते राकेश टिकैत प्रतिक्रिया देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यावर सडकून टीका केली.
शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी येथील हत्याकांडावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्यावर सडकून टीका केली. खैराच्या लाकडांची चोरी करणारा आणि नेपाळमध्ये खतांची तस्करी करणारा गृहमंत्री झाला, तर शेतकऱ्यांवर गाडी चढवणारा क्रांतीकारी मुलगा जन्माला येणारच, असं म्हणत टिकैत यांनी खोचक टोला लगावला. तसेच मिश्रा यांच्या मुलाने मागच्या बाजूने येत शेतकऱ्यांना चिरडलं. त्याचे सर्व पुरावे व्हिडीओ स्वरुपात असल्याचंही सांगितलं. इंटरनेट सुरू झाल्यानंतर सर्व पुरावे समोर ठेऊ, असंही त्यांनी सांगितलं. ते न्यूज २४ या वृत्तवाहिनीशी बोलत होते.
राकेश टिकैत म्हणाले, “केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा खैराच्या लाकडाची चोरी करत होते. नेपाळमध्ये खतांची तस्करी करत होते. त्याच्यावर गुंडगिरीचे गुन्हे दाखल आहेत. असे लोक गृहमंत्री झाले तर मुलगा क्रांतीकारी जन्माला येणारच. ज्यांनी शेतकऱ्यांना गाडीने चिरडलं ते हल्लेखोर होते. जमाव हल्लेखोरांना मारुन टाकतात. पहिला हल्ला कुणी केला? बचावासाठी जमावाने हल्लेखोरांना मारलं असू शकतं. जेव्हा ५-६ लोकांचा मृत्यू होतो तेव्हा अशा तीव्र प्रतिक्रिया उमटतात.”