खोची/प्रतिनिधी
सुमारे साडे चार महिन्यापूर्वी खोची ( ता.हातकणंगले) येथील बंडा उर्फ प्रदीप पोवार या युवकाने सहा वर्षीय बालिकेचे अपहरण करून, तिच्यावर लैंगिक अत्याचार करून, तिचा खून केला होता. या खूनाच्या खटल्यासाठी राज्य शासनाने विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उमेशचंद्र यादव-पाटील यांची नियुक्ती केली आहे. विधी व न्याय विभागाच्या कक्ष अधिकारी वैशाली बोरुडे यांनी या बाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.
संशयीत आरोपी बंडा उर्फ प्रदीप पोवार याने एका सहा वर्षीय बालिकेचे ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी भरदिवसा अपहरण केले होते. अपहरणाच्या घटनेनंतर काही तासाच्या कालावधीत लोटताच पिडीतेचा मृतदेह आढळून आला होता. पोलीस तपासात संबंधीत बालिकेचे प्रथम अपहरण, बलात्कार करून खून केल्याचे स्पष्ट झाले होते.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा पोलिस प्रमुख डॉ शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर व इचलकरंजी स्थानिक गुन्हा शाखा आणि पेठ वडगाव पोलिसांनी संशयीत आरोपीचा कसून शोध घेत, संशयीत आरोपी बंडा उर्फ प्रदीप पोवारला काही तासातच जेरबंद करण्यास यश मिळविले आहे. सध्या संशयीत कंळबा कारागृहाची हवा खात आहे.
या खूनाच्या घटनेची राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेतली. या खून खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. यादव यांची निवड केली आहे. ॲड. यादव हे मूळचे कोल्हापूरचे असून, राज्य शासनाच्या वतीने महत्वाच्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम करीत आहेत. यामध्ये हजारो कोटींचा सिटी लीमोझिंन घोटाळा, संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारे कोपर्डी खून-बलात्कार प्रकरण, जवखेडे अहमदनगर येथील तिहेरी दलित हत्याकांड, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे जामखेड दुहेरी हत्याकांड, सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे खून प्रकरण, पोलीस अधिकाऱ्यानी कर्तव्यावर असताना मॉडेलवर केलेले साकिनाका बलात्कार प्रकरण, घाटकोपर येथील हिरे व्यापारी उदानी हत्याकांड, संगमनेर येथील व्यापारी गौतम हिरेन अपहरण-खून प्रकरण, रझा अकादमीच्या मोर्च्यावेळी घडलेली मुंबईतील आझाद मैदान दंगल प्रकरण या इतर महत्वाच्या प्रकरणांचा समावेश आहे.