नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
कोरोना परिस्थितीवरून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकारवर टीकासत्र सुरूच आहे. देशात गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रोजच्या घटनेत घट झाली आहे, परंतु मृत्यूची संख्या कमी होत नाही. तर दुसरीकडे देशातील बर्याच राज्यांना लस टंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, देशात लसीकरण कमी होत आहे आणि कोरोनामुळे मृत्यू वाढत आहेत. आशा स्थितीत लोकांची दिशाभूल करणे, खोट्या गोष्टी पसरवणे आणि तथ्य लपवणे हेच केंद्र सरकारचे धोरण असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
राहुला गांधी यांनी मंगळवारी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकारवर टीका केली होती. त्यांनी ट्वीट करत म्हटले होते की, येणाऱ्या काळात मुलांना कोरोनापासून संरक्षित करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत बालरोग सेवा आणि लस उपचार प्रोटोकॉल आधीच तयार करणे आवश्यक आहे. त्यासाठी भारताच्या भविष्यासाठी ‘मोदी सिस्टिमला’ झोपेतून उठवणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले होते.