ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या लॉकडाउनच्या स्थितीत गेल्या चार महिन्यांपासून खोळंबलेली पुणे महापालिकेची विकासकामे तातडीने सुरू करावीत अशी मागणी शहर भाजपच्या शिष्टमंडळाने आज मनपा आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली.
शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सिध्दार्थ शिरोळे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, मेधा कुलकर्णी, योगेश टिळेकर, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, शहर भाजप प्रभारी गणेश बिडकर, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
मुळीक म्हणाले, गेल्या चार महिन्यांपासून शहरातील महापालिकेची सुरू झालेली आणि अर्धवट असलेली विकासकामे खोळंबली आहेत. त्यामध्ये मेट्रो, भामा आसखेड प्रकल्प, समान पाणीपुरवठा, बसेसची खरेदी, विविध ठिकाणी उड्डाणपूल, चांदणी चौकातील वाहतूक प्रकल्प, शिवणे-खराडी नदीपात्रातील रस्ता, कात्रज कोंढवा रस्ता, आंबील ओढा पुनर्विकास, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, समाविष्ट गावांतील विकासकामे, स्मार्ट सिटी प्रकल्प, प्रधानमंत्री आवास योजना, ई लर्निंग प्रणाली या महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. ही सर्व विकासकामे तातडीने सुरू करावीत अशी मागणी केली आहे.
खासदार बापट म्हणाले, कोरोनाचा लढा केंद्र, राज्य, महापालिका अशा तीन पातळींवर लढावा लागणार आहे. केंद्राला राज्य सरकारला भरीव आर्थिक पॅकेज दिले असताना राज्य सरकार मात्र कुठलेच आर्थिक पॅकेज जाहीर करीत नाही. हातावर पोट असणारे कष्टकरी, श्रमिक, बाराबलुतेदार यांना जीवन कसे जगायचे हा मोठा प्रश्न पडला आहे. त्यांना नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत लागणार आहे. शासनाने जास्तीत जास्त मदत करणारे आर्थिक पॅकेज जाहीर करावे.