वृत्तसंस्था/ मुंबई
खो खो हा एक भारतीय पारंपारिक खेळ आहे. हा भारतातील बहुतेक सर्व राज्यांमध्ये खेळला जातो आणि सर्वांनाच आवडणारा हा राष्ट्रीय खेळ आहे. आता तर खो-खो आंतरराष्ट्रीय स्तरावर सुध्दा जोमात खेळला जातो आहे. खो-खो खेळामध्ये खेळाडूच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करतात तसेच या खेळातील कौशल्य सुध्दा नेत्रदीपक असतात.
1970-71 ते 1998-99 पर्यंत जवळपास 13 खो-खो खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. 1998-99 नंतर अर्जुन पुरस्कारासाठी खो-खो खेळाडूंबाबत काही नियम केंद्र सरकारने बदलले आणि खो-खो खेळाडूंना दिला जाणारा अर्जुन पुरस्कार थांबविण्यात आला. खो-खो खेळाडूंना प्रोत्साहन, पाठिंबा आणि प्रेरणा देण्याची गरज आहे. जेणेकरुन ते आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना भारतासाठी गौरवशाली कामगिरी करू शकतील आणि जगभरात हा खेळ लोकप्रिय होऊ शकेल.
1958 पासून आतापर्यंत राष्ट्रीय खो-खो स्पर्धांचे आयोजन भारतभर वेगवेगळय़ा ठिकाणी करण्यात आलेले आहे. 2017 साली झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत प्रथमच खो-खो समावेश झाला होता. 2020 साली नेपाळ येथे झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत सुध्दा खो-खोचा समावेश होता व या दोन्ही स्पर्धेत भारताच्या पुरुष व महिला संघांनी सुवर्ण पदकाला गवसणी घालत भारतासाठी गौरवशाली क्षण मिळवून दिला. यासोबतच आशियाई खो-खो स्पर्धांचे नियमितपणे आयोजन केले जाते.
त्यामुळेच अर्जुन पुरस्कार वितरण करताना खो-खो खेळाडूंचा विचार आवर्जून करावा व खंडित झालेला हा अर्जुन पुरस्कार पुन्हा एकदा खो-खो खेळाडूंना देण्याची विनंती भारताच्या क्रीडा मंत्र्यामार्फत आपल्या केंद्र सरकारकडे करत असल्याचे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष संजीवराजे नाईक ा निंबाळकर, भारतीय खो खो महासंघाचे सहसचिव चंद्रजीत जाधव, कार्याध्यक्ष-सचिन गोडबोले, सरचिटणीस-ॲड. गोविंद शर्मा, खजिनदार अरुण देशमुख आदी खो-खोतील मान्यवरांनी संगितले आहे. तसेच त्यांनी त्यासंबधीचे पत्र सुध्दा किरण रिजिजू -क्रीडा मंत्री (राज्य मंत्री – स्वतंत्र कार्यभार) यांना देण्यात आले असल्याचे सांगितले आहे. याचबरोबर महाराष्ट्रातील सर्व खासदारांना यासंबंधीचे पत्र देण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे सरचिटणीस ऍड. गोविंद शर्मा यांनी कळवले आहे.