जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
गेल्या काही वर्षांपासून ख्रिस्ती बांधवांच्या विरोधात खोटा अपप्रचार करण्यात येत आहे. त्यामुळे ख्रिस्ती बांधवांना मानसिक त्रास होत असून संबंधितांवर कारवाई करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय ख्रिस्ती महासभा संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
काही संघटना जाणूनबुजून आम्हाला त्रास देत आहेत. प्रार्थना करत असलेल्या ठिकाणी येऊन धमकी देत आहेत. मारबडव करत आहेत. खोटे गुन्हे दाखल करत आहेत, असे देखील या निवेदनात म्हटले आहे. विधानसभेमध्ये आमदार गोळीहट्टी शेखर यांनी 20 हजार रुपये देऊन हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे, असा आरोप केला आहे. यामध्ये कोणतेही तथ्य नाही. त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत, असे असताना ख्रिस्ती बांधवांना बदनाम करण्यासाठी त्यांनी विधानसभेत ख्रिस्ती बांधवांविरोधात आपले म्हणणे मांडले आहे.
अशाच प्रकारे आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो थांबवावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष ऍड. रिचमॅन्ड्रीक वाय. नवग्रह, बसवराज धावली, नॅथ्रीअल आर. के., मारुती बडीगेर, सुकुमा बायकुड, गुरुराज कुसगल, चंद्राप्पा केंचनूर, महादेव राठोड यांच्यासह इतर ख्रिस्ती बांधव उपस्थित होते.