गावांपर्यंत पोहोचलाय जय श्रीरामचा नारा : अम्फानमधील भ्रष्टाचार, गुंडगिरी महत्त्वाचे मुद्दे
हिंदूंचे प्रसिद्ध धार्मिक स्थळ गंगासागरमध्ये यंदा ध्रूवीकरण स्पष्टपणे दिसून येत आहे. 30 टक्के मुस्लीम आणि 70 टक्के हिंदुबहुल असलेल्या या मतदारसंघात ‘जय श्री राम’ हा नारा गावांपर्यंत पोहोचला आहे. 2016 च्या निवडणुकीत केवळ 7177 मते मिळविणाऱया भाजपसाठी अम्फान वादळादरम्यान तृणमूल सरकारच्या काळातील भ्रष्टाचाराने जणू प्राणवायूच पुरविला आहे. समुद्र किनाऱयांना लागून असलेल्या गोसाबा, काकद्वीप, सागर आणि पथरप्रतिमा या ठिकाणी भाजपने अम्फानवेळी झालेला भ्रष्टाचारालाच सर्वात मोठा मुद्दा ठरविले आहे. या मुद्याचा प्रभावही तेथू जाणवतोय. पण सागर मतदारसंघात अल्पसंख्याक समुदाय तृणमूल काँग्रेससोबत दिसून येत आहे.
आपत्तीप्रसंगी आवश्यक सुविधा पोहोचू न शकल्याचे दुःख लोकांना आहे. आर्थिक मदत काही जणांना मिळाली, काहींना मिळाली नाही. गुंडगिरी आणि जमिनींवर झालेला कब्जाही लोकांच्या वेदनेत सामील आहे. माकप सरकारच्या काळात येथे मोठय़ा प्रमाणवर जमिनींचे वाटप करण्यात आले होते. तृणमूलनेही हाच कित्ता गिरविल्याने लोकांमध्ये नाराजी आहे.
गंगासागरपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे 4 किलोमीटरचा जलमार्ग ओलांडावा लागतो. तृणमूल आणि भाजप दोघांनीही निवडणूक जिंकल्यावर येथे ओव्हरब्रिज तयार करण्याचे आश्वासन दिले आहे.
येथे भाजपमुळे ‘जय श्री राम’ हा नारा गावांपर्यंत पोहोचला आहे. कार्यकर्ते भगवा गमछा परिधान करून फिरत आहेत. केंद्र सरकारचे वीज आणि रस्तेप्रकल्प तृणमूल काँग्रेसने स्वतःच्या नावावर दाखविले आहेत. पोलीस तृणमूल नेत्यांच्या इशाऱयावर काम करतात. अम्फान वादळादरम्यान तृणमूल नेत्यांनी स्वतःचे खिसे भरल्याचा आरोप भाजप उमेदवार विकास कामिला यांनी केला आहे. मतदारसंघात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा पार पडली आहे. गंगासागर कोलकात्यापासून सुमारे 150 किलोमीटर अंतरावर आहे. हा भाग सागर विधानसभेच्या अंतर्गत येतो. 2,43,055 मतदार असलेल्या या मतदारसंघावर 2011 पासून तृणमूल काँग्रेसचा कब्जा आहे. 2011 मध्ये तृणमूलच्या बंकिमचंद्र हाजरा यांनी माकप उमेदवाराला 819 मतांनी पराभूत केले होते. तर 2016 च्या निवडणुकीत विजयाचे अंतर 8,071 मतांचे राहिले हेते. भाजप उमेदवाराला 7177 मते मिळाली होती. भाजपच्या मतांची टक्केवारी केवळ 3.3 टक्के होती, पण मागील 3-4 वर्षांमध्ये भाजपने येथे स्वतःचा प्रभाव निर्माण केला आहे.