प्रतिनिधी / वास्को
गोवा शिपयार्डतर्फे उत्तर प्रदेश राजकीय निर्माण निगमसाठी बांधण्यात आलेली रिव्हर प्रुझ पॅसेंजर फेरी काल गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाला समर्पीत करण्यात आली. वाराणसी येथे व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे संरक्षण मंत्रालय व उत्तर प्रदेश सरकारच्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
सदर फेरी बोट बांधणीसाठी गोवा शिपयार्ड व उत्तर प्रदेश राजकीय निर्माण निगम यांच्यामध्ये 14 फेब्रुवारी 2019 रोजी भारत सरकारच्या ‘प्रसाद’ योजनेअंतर्गत करार झाला होता. पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि घाटांमधील अंतर जोडण्यासाठी वाहतुकीचे माध्यम म्हणून ही फेरीबोट बांधण्यात आलेली असून या फेरीचे उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील राजघाट/रवीदास घाट आणि असी घाट या दरम्यान गंगा नदीत ही फेरी तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे तेथील पर्यटकांसाठी निसर्ग आणि देव दर्शनाची नवीन सोय उपलब्ध होणार आहे. गंगा नदीच्या पर्यटनाला चालना देण्यासाठीच या प्रवासी फेरीची रचना करण्यात आली आहे.
या फेरीद्वारे 80 प्रवासी प्रवास करू शकतात. ही फेरी गोव्यातून श्रीलंका मार्गे विशाखापट्टणम तसेच बिहार मार्गे उत्तर प्रदेशातील वाराणसीकडे रवाना झाली होती. जवळपास देशातील 5 हजार किलो मिटरची किनारपट्टी या प्रवासात या प्रवासी बोटीने कापली आहे..