केरळचे राज्यपाल आरिफ खान यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ प्रयागराज
पतित पावन माता गंगेची सद्यकाळातील दशा पाहून चिंता वाटते. गंगेला स्वच्छ, अविरल आणि निर्मळ करण्याचे प्रयत्न खूप झाले, सरकारी कार्यक्रम तयार झाले, घोषणा झाल्या, चिंता व्यक्त करण्यात आली आणि अंमलबजावणी देखील झाली. या सर्वगोष्टी जवळपास योग्य दिशेने होत्या, पण तरीही माता गंगेबद्दलचे वर्तन कुठे तरी हरविले असल्याचे मोठय़ा खेदासह म्हणावे लागत असल्याचे प्रतिपादन केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी शनिवारी केले आहे. ते प्रयागराज येथील एका कार्यक्रमात बोलत होते.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या यंग लॉयर्स असोसिएशनने शनिवारी मोक्षदायिनी गंगा मातेच्या संरक्षणासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात केरळचे राज्यपाल मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. भारतीय संस्कृती आणि गंगेच्या अविरलतेवर आम्हाला गर्व असायला हवा. पण ज्याप्रकारे गंगामाता आम्हा सर्वांना स्वतःचे अपत्य मानून प्रेम आणि मोक्ष देते, ते पाहता आम्ही त्यास पात्र आहोत का हा विचार आम्ही करणे गरजेचा आहे. गंगेच्या प्रदूषणामागील सर्वात मोठे कारण आम्हीच आहोत असे उद्गार आरिफ खान यांनी काढले आहेत.
गंगेला केवळ आम्ही एक नदी समजून त्याच्या पाण्याचा अतिरेकी वापरच करत राहिलो. तसेच नदीपात्रात प्रदूषण करत राहिलो. गंगा नदी देशातील 8 राज्यांमधून वाहते, पण दक्षिण भारतात गंगा नदी नाही. तेथे नदीचे अस्तित्व नसले तरीही दक्षिण भारतातील लोकांची संस्कृती, साहित्य, शिक्षण आणि मनोभावात गंगामातेचे पावित्र्य हे प्रयागराजच्या संगमाच्या पावनपणाइतकेच आहे. गंगा स्वच्छ रहावी, प्रदूषित होऊ नये याकरता नदीकाठावर वसलेल्या 40 कोटी लोकांची मोठी जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.