@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
तिचे नाव सरस्वती पात्रा. ती मूळची ओडिशाची. मागील सहा वर्षांपासून गौतम गंभीरच्या घरी काम करायची. पण, अचानक आजारपणाने तिला पछाडले, त्यातच तिचा मृत्यू झाला आणि लॉकडाऊनमुळे तिचे पार्थिव मूळ गावी पाठवणेही कठीण झाले. या परिस्थितीत गौतम गंभीरने स्वतः अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला व अंतिम सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर ट्वीटरवरुन याची माहिती दिली.
‘सरस्वती या माझ्या कुटुंबातील सदस्य होत्या. माझ्या मुलांची सेवा त्यांनीच केली. त्यामुळे, या प्रतिकूल स्थितीत त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी देखील माझ्यावरच होती. ती मी पार पाडली’, असे गंभीर आपल्या ट्वीटमध्ये म्हणाला. माध्यमांनी प्रसारित केलेल्या वृत्तानुसार, 49 वर्षीय सरस्वती पात्रा या मूळ जयपूर जिल्हय़ातील रहिवासी आहेत.
‘समोरील व्यक्तीला सन्मान देण्यावर माझा विश्वास आहे. जातपात, धर्म, पंथ, पतप्रतिष्ठा, सामाजिक स्थान या सर्व बाबी माझ्या दृष्टीने गौण आहेत. आदर्श भारत म्हणून माझी ही कल्पना आहे’, असे त्याने येथे नमूद केले. 38 वर्षीय गंभीरने 2004 ते 2016 या कालावधीत भारतीय संघातर्फे 58 कसोटी सामने खेळले आहेत.