प्रतिनिधी / असळज
गगनबावडा तालुका आत्मा अंतर्गत शेतकरी सल्लागार निवड समितीमध्ये बावीस सदस्यांपैकी धुंदवडे भागामध्ये फक्त एकच सदस्य असल्याने त्या भागातील शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. गगनबावडा तालुक्यामध्ये पंचायत समितीचे असळज, कोदे, तिसंगी व धुंदवडे हे चार गण असून असळज व तिसंगी हे दोन जि. प. मतदारसंघ आहेत. शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी गगनबावडा तालुक्यामध्ये आत्मा अंतर्गत शेतकरी सल्लगार समिती नेमली आहे. यामध्ये पदाधिकारीसह २२ सदस्य आहेत. परंतु सदस्य निवडीचा विचार केल्यास आत्मा शेतकरी सदस्य निवडीमध्ये धुंदवडे पंचायत समिती गणामधील फक्त एकाच शेतकऱ्याचा समावेश करण्यात आला आहे. तर असळज पंचायत समिती गणामधील चार सदस्यांचा समावेश आहे. या समितीमध्ये कृषी विभागातील गटानुसार विचार केल्यास पर्यवेक्षण ०१ व पर्यवेक्षण ०२ असे भाग पडतात. यानुसार पर्यवेक्षण ०१ मधील फक्त ०३ सदस्य आहेत. तर पर्यवेक्षण ०२ मधील १९ सदस्य आहेत. त्यामुळे असळज परिसरासह धामणी खोरीमधील शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. धामणी भागामध्ये सर्वसाधारण सात गावे व दहा वाड्या मिळून अंदाजे ११००० लोकसंख्या आहे. पाण्याची शास्वती नसतानाही शेतीत विविध प्रयोग करण्यासाठी या भागामधील शेतकरी धडपडत आहेत. एकत्र येवून येथील शेतकरी दरवर्षी ११ बंधारे घालून पाणी अडवून शेती करतात. त्यांच्या या एकत्र येण्याच्या बाजूचाही या समिती निवडीबाबत विचार होणे गरजेचे आहे. या भागामध्ये पडीक जागेवर भात, नाचना, वरी लागवड क्षेत्र वाढत आहे. त्याचबरोबर दुध उत्पादनातही वाढ होत आहे. तरुण शेतकरी मुलेही शेतीत नवनवे प्रयोग करत आहेत. त्यामुळे या समितीबाबत धामणी खोरा दुर्लक्षित राहिला की काय ? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
शेतकऱ्यांच्या आत्म्याशी निगडीत असणाऱ्या या समितीमध्ये शेतकऱ्यांना विविध योजना विषयी मार्गदर्शन केले जाते. त्याचबरोबर शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती, त्याचबरोबर शेती सुजलाम–सुफलाम कशी होईल यावर भर दिला जातो. त्यामुळे या समितीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते.
गगनबावडा तालुका आत्मा अंतर्गत शेतकरी सल्लागार निवड समिती नेमताना कोणत्या निकषाचा विचार केला, असा प्रश्न पडतो. शेतकऱ्यांच्या गावांचा विचार केला जातो काय ? राजकीय पक्षांचा विचार केला जातो काय ? राजकीय गटांचा विचार केला जातो काय ? असा प्रश्न सामान्य शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे सदस्य निवडीबाबत किती गावे वंचित राहिलीत, की ठेवलीत ? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अनेक गावे समितीमध्ये दुर्लक्षित कशी झालीत, असा प्रश्न अनेक शेतकऱ्यांना पडला आहे.