प्रतिनिधी/ वडूज
चोराडे (ता.खटाव) येथील मुख्य रस्त्यावरील गटार वाहन चालकांच्या जीवावर बेतत आहे. संबंधित ठेकेदारांनी यावर तातडीने उपाय योजना करण्याची मागणी होत आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, चोराडे गावातून विटा-महाबळेश्वर राज्य मार्गाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण झाली आहे. मुख्य रस्त्याच्या दुतर्फा गटार कामे करीत असताना नागरिकांनी अतिक्रमणे लगेच काढून घेतली तरीही ठेकेदाराकडून दिरंगाई होत आहे. कोरोनामुळे लॉकडाउन होऊन काम थांबले, पुन्हा अनलॉक झाल्यानंतर इतर ठिकाणी गटारांची कामे चालू झाली परंतु चोराडे येथे अजूनही गटार काम अपूर्णच आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे गटार दारात आणि पाणी घरात अशी परिस्थिती निर्माण झाली. रस्ता चांगला झाल्यामुळे वाहनांची ये-जा वाढली असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अपूर्ण गटाराच्या सळ्या मोकळ्या असल्याने अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. वाहन चालकाच्या जीवाशी न खेळता ही कामे ताबडतोब पूर्ण करण्यात यावी.
दरम्यान स्लॅब व झाकण टाकून नागरिकांच्या हिताचे काम करावे. ठिकठिकाणी मुरूम पडलेला असून तोही व्यवस्थित करण्याचे काम हाती घ्यावे. उर्वरित राहिलेले काम ताबडतोब पूर्ण करून ग्रामस्थांची होणआरी गैरसोय दूर करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत पिसाळ यांनी केली आहे. मुख्य रस्त्याला जोडलेले अंतर्गत मार्गही उंच गटारामुळे निरुपयोगी झालेले आहेत. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराने अंतर्गत मार्गाच्या काही गटाराची उंची कमी केलेली नाही, त्यामुळे हे मार्ग वाहतुकीस अडचणीचे झाले आहेत.