प्रतिनिधी /बेळगाव
गटारींचे बांधकाम करताना विविध वाहिन्यांचे स्थलांतर करण्यात आले नसल्याने कचरा अडकून सांडपाण्याचा निचरा होत नसल्याचे आढळून आले आहे. यरमाळ रोड, पाटील गल्ली परिसरात गटारीमध्ये बीएसएनएलची केबल असल्यामुळे कचरा अडकून सांडपाणी वाहण्यास अडचण होत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून येथील वाहिन्या त्वरित हटविण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.
महापालिकेकडून गटारीचे बांधकाम केले जाते. पण गटारी बांधताना आडव्या येणाऱया जलवाहिन्या, विद्युतवाहिन्या तसेच टेलिफोन वाहिन्या हटविल्या जात नाहीत. यरमाळ रोड पाटील गल्ली परिसरातील गटारीमध्ये असलेल्या बीएसएनएलच्या केबलमुळे कचरा साचून सांडपाणी वाहण्यास अडचण होत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून सांडपाणी साचल्याने विहिरींमध्ये पाझरत आहे. तसेच डासांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे.
येथील समस्येची पाहणी करून निवारण करावे, अशा मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते मनोहर शिरोडकर यांनी दिले आहे. मात्र वर्ष झाले तरी अद्याप या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.