कचरा अडकून सांडपाणी रस्त्यावर : समस्येचे निवारण करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
गटारींचे बांधकाम करताना विविध वाहिन्यांचे स्थलांतर करण्यात आले नसल्याने कचरा अडकून पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याचे आढळून आले आहे. यरमाळ रोड, पाटील गल्ली परिसरात गटारीमध्ये बीएसएनएलची केबल असल्यामुळे कचरा अडकून सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. येथील वाहिन्या त्वरित हटविण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.
मनपाकडून गटारीचे बांधकाम केले जाते. पण गटारी बांधताना आडव्या येणाऱया जलवाहिन्या, विद्युत वाहिन्या तसेच टेलिफोन वाहिन्या हटविल्या जात नाहीत. या वाहिन्या त्याच ठिकाणी ठेवून गटारीचे बांधकाम पूर्ण केले जाते. पण याचा फटका नागरिकांना बसत आहे. या विविध वाहिन्यांमध्ये कचरा अडकून सांडपाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होतो. अलिकडेच झालेल्या पावसामुळे यरमाळ रोड पाटील गल्ली परिसरातील गटारीमध्ये कचरा साचून सांडपाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे दुर्गंधी पसरली होती. सध्या विविध परिसरात डेंग्यूच्या साथीचा प्रसार होत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. तरीदेखील साचलेल्या गटारीमधील सांडपाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने कोणतीच कारवाई केली जात नाही.
येथील समस्येची पाहणी करून निवारण करावे, अशा मागणीचे निवेदन माजी नगरसेवक मनोहर हलगेकर आणि सामाजिक कार्यकर्ते मनोहर शिरोडकर यांनी केले आहे.