अनगोळ लोहार गल्लीतील गटार काम पावसामुळे ठप्प झाल्याने समस्या
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील विविध कामे स्मार्ट सिटी योजनेंतर्गत करण्यात येत असून अनगोळ लोहार गल्ली परिसरात गटारीचे बांधकाम करण्यात येत आहे. पण पावसाळय़ाच्या तोंडावर हाती घेतलेले काम पावसामुळे ठप्प झाले आहे. काँक्रिटीकरणासाठी तयारी करण्यात आली होती, पण काही साहित्य पाण्यामधून वाहून गेले आहे. यामुळे गटारीच्या काँक्रिटीकरणासाठी खोदण्यात आलेली चर धोकादायक बनली आहे.
गटारीच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत गटारीचे बांधकाम करण्यात येत आहे. पण सदर काम पावसाळय़ाच्या तोंडावर सुरू करण्यात आल्याने नागरिकांच्या सोयीचे होण्याऐवजी डोकेदुखीचे बनले आहे. लोहार गल्ली रस्त्याशेजारील गटारी बांधण्यासाठी खोदाई करण्यात आली आहे. काँक्रिटीकरणासाठी तयारी करण्यात आली होती. पावसाचा जोर वाढल्याने त्यामधून साहित्य वाहून गेले आहे. पावसामुळे सदर काम अर्धवट बंद ठेवण्याची वेळ आली असून काँक्रिटीकरणासाठी खोदलेल्या चरी रहिवाशांसाठी धोकादायक बनल्या आहेत. काँक्रिटीकरणासाठी घालण्यात आलेल्या सळय़ा रहिवाशांसाठी जीवघेण्या ठरल्या आहेत. सदर काम अर्धवट असून नागरिकांना घरातून बाहेर पडणे कठीण बनले आहे. पावसाच्या पाण्यामधून वाट काढत घरात शिरताना गटारीत पडण्याचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.