मच्छे येथील स्वच्छता कर्मचाऱयांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
गटारी स्वच्छ करण्याचे काम गेली अनेक वर्षे आम्ही करत आहोत. मात्र आम्हाला वेळेत वेतन तसेच कंत्राटदाराला रक्कम दिली जात नाही. ग्राम पंचायत ही नगरपंचायतमध्ये समाविष्ट करण्यात आल्यानंतर समस्या निर्माण होत आहेत, असे सांगितले जात आहे. मात्र त्यामुळे आम्ही अडचणीत आलो आहे. तरी तातडीने आम्हाला टेंडरप्रमाणे ठरलेली रक्कम द्यावी, अशी मागणी मच्छे येथील गटारी साफ करणाऱया कंत्राटदार आणि स्वच्छता कर्मचाऱयांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मच्छे व पिरनवाडी ही पूर्वी ग्राम पंचायत होती. मात्र या दोन्ही ग्राम पंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा दिला गेला आहे. त्यामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. कर्मचाऱयांचे वेतन, कंत्राटदाराची रक्कम, तसेच इतर कामे खोळंबली जात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही मच्छे येथील गटारी साफ करण्याचे काम करत आहे. त्यासाठी 15 ते 20 कर्मचारी दररोज काम करत असतात. त्यासाठी टेंडर मागविले होते. टेंडरनुसार आम्ही ते काम करत आहे. मात्र आम्हाला रक्कम दिली जात नाही. त्यामुळे सर्वच कर्मचारी अडचणीत आले आहेत. तेंव्हा तातडीने आम्हाला रक्कम द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ग्रा. पं. माजी सदस्य सचिन बेळगावकर, ठेकेदार व्यंकटेश वानराशी, लक्ष्मण वानराशी, गणेश मोनोदर, अर्जुन टेकोळ, कृष्णा मिरहाल, जंगली बेटेकोळ, अंजया बेटेकोळ, नारायण मोतोल, मंजू वानराशी, जंगली वानराशी यांच्यासह इतर कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.