ऑनलाईन टीम / गडचिरोली :
गडचिरोलीत पुन्हा एकदा पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. कसनासुर- कोटमी येथील जंगलात झालेल्या या चकमकीत पोलिसांनी 13 नक्षलवाद्यांना ठार केले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सी- 60 युनिटकडून ही कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी 8 जणांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले की, सकाळपासूनच नक्षलवाद्यांविरोधी अभियान राबविण्यात येत आहे. जंगलात अभियान सुरू असताना नक्षलवाद्यांचे शिबिर सुरू असणाऱ्या ठिकाणी पोलिसांची तुकडी पोहचली. पोलीस दिसताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळीबार सुरू केला असून या चकमकीत 13 नक्सल ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
पाटील म्हणाले, सद्य स्थितीत मृतदेह गोळा करण्याचे काम सुरू असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अभियान पूर्ण झाल्यावरच एकूण किती नक्षलवादी ठार झाले आहेत याबाबतची माहिती समोर येईल.
दरम्यान, सध्याचा काळ हा तेंदू पत्ता संकलनाचा काळ आहे. या संपूर्ण भागाची अर्थव्यवस्था तेंदू पत्ता संकलनावर अवलंबून आहे. त्यामुळे याला नेमकी किंमत द्यायची याकडे शासनाचा भाग असला तरीही सत्यपरिस्थिती हीच आहे की नक्षलवादीच या किमती ठरवतात. याच किंमती ठरवण्यासाठीची बैठक नक्षलवाद्यांनी एका गावात बोलावली होती. या माहितीच्या आधारेच पोलिसांनी आखणी करत बैठक सुरु असताना दबा धरून बसत, त्यांनी ही कारवाई केली.