वार्ताहर/ माखजन
रत्नागिरी पाटबंधारे मंडळाच्या अधिकाऱयांकडून गडनदी प्रकल्पग्रस्तांची दिशाभूल केली जात आहे. प्रकल्प पूर्ण झाल्याची घोषणा करण्याची घाई रत्नागिरी पाटबंधारे मंडळाचे अधिकारी करत असल्याची बाब प्रकल्पग्रस्तांच्या लक्षात येताच प्रकल्पग्रस्तांनी आपली नाराजी व्यक्त करत प्रकल्पग्रस्तांची कामे रोखून कामात खोडा घालणाऱया अधिक्षक अभियंता यांची तातडीने बदली करण्याची मागणी केली आहे. अधिक्षक अभियंता यांची बदली करणे शक्य नसेल तर रत्नागिरी पाटबंधारे मंडळाकडे असलेला गडनदी प्रकल्पाचा पदभार काढून ठाणे पाटबंधारे मंडळाकडे सोपवावा, अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे 8 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जिल्हा दौऱयावर आले असता आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
या मागणीनुसार अधिक्षक अभियंता यांची तातडीने बदली करण्यात यावी अन्यथा गडनदी भुसंपादन, पुनर्वसन आणि कालवे ही कामे ठाणे पाटबंधारे मंडळाकडे वर्ग करण्यात यावीत, अशी मागणी संतोष येडगे यांनी केली आहे. प्रकल्पग्रस्तांच्यावतीने प्रातिनिधिक स्वरूपात उपसरपंच संतोष येडगे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निवेदन दिले. चिपळुण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी रखडलेल्या पुनर्वसन कामासंदर्भात आपली नाराजी व्यक्त केली आहे. उपसरपंच तथा पत्रकार संतोष येडगे यांनी लिहीलेल्या पत्राला संदर्भीय पत्र जोडून गडनदी धरण प्रकल्पाची भुसंपादन, पुनर्वसन आणि कालवे ही कामे ठाणे मंडळाकडे सोपवण्याची अधिकृत मागणी केली आहे.प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळावा म्हणून आमदार शेखर निकम प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी असल्याचे यावेळी संतोष येडगे म्हणाले.