सुधाकर काशीद / कोल्हापूर
पन्हाळ्यातल्या पावनगडावर दहा-पंधरा पावनगड प्रेमी तरुण गेली दोन वर्षे त्यांच्या त्यांच्या ताकदीनुसार संवर्धनाचे काम करत होते. टीम पावनगड असेच त्यांच्या या टीमचे नाव. पन्हाळ्याजवळअसून अपरिचित राहिलेल्या पावन गडाचे संवर्धन करण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांच्या परीने सुरू होता. आणि दोन दिवसापूर्वी दिशादर्शक फलक बसवताना या तरुणांना पावनगडावर चक्क मातीत तोफेचे गोळे सापडले. एक एक गोळा मातीतून बाहेर निघत गेला. आणि बघता बघता 406 तोफगोळ्यांचा ढीगच तयार झाला…….
दहा-पंधरा तरुणांच्या गड प्रेमातून हे तोफगोळे नव्हे तर त्या तोफगोळ्याच्या माध्यमातून तत्कालीन इतिहासावर खूप मोठा प्रकाश पडला. पावनगड व त्यावर काम करणारी टिम पावनगड हे झाले केवळ एक उदाहरण. पण महाराष्ट्रातल्या गड-किल्ल्यावर असे असंख्य तरुण त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार संवर्धनाचे काम करत आहेत. कमी कधी त्यांना पुरातत्व खात्याचे, कधी वन खात्याचे, कधी स्थानिकांचे निर्बंध सहन करावे लागत आहेत. पण हे तरुण त्यांची जिद्द कायम ठेवून आहेत. याच जिद्दीला बळ देण्यासाठी उद्या कोल्हापुरात फोर्ट फेडरेशनची घोषणा होणार आहे. आणि निमित्त आहे संभाजीराजे छत्रपती यांच्या वाढदिवसाचे आणि होणाया दुर्ग परिषदेचे.
गड किल्ल्याचे संवर्धन हा जरुर असंख्य तरुणांच्या इतिहास प्रेमींच्या मनात दडलेला भावनात्मक विषय आहे. ज्या गड किल्ल्याच्या साक्षीने इतिहास जगला इतिहास घडला त्याची काळाच्या ओघात झालेली पडझड अनेकांना पहावत नाही. मग ते आपल्या परीने त्याच्या गड संवर्धनाचे काम उन्हातानात करत राहतात. शहाणे लोक त्यांना वेडÎात काढतात. पण महाराष्ट्रात विविध ठिकाणी काम करणारे हे तरुण आपली जिद्द कायम ठेवतात.
स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर ही असेच काम तरुणांच्या वेगवेगळ्या गटाकडून पूर्वी सुरू होते. पण खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकारातून केंद्र व राज्य सरकार यांच्या सहकार्याने रायगड प्राधिकरण स्थापन झाले आणि रायगड संवर्धनाच्या कामाला योग्य दिशा मिळाली. काळाच्या ओघात दगड-मातीत दडलेला रायगडाचा बराच भाग पुन्हा उजेडात आला. तीनशेहून अधिक घराचे जोते रायगडावर मिळाले .जुनी भांडी, कौले, अलंकार , खिळे, अवजारे असे अवशेष मिळाले. रायगडावरील हत्ती तलावातील गाळ निघाला. एकशे पन्नास वर्षानंतर प्रथमच गेल्या वर्षी हा तलाव पाण्याने पूर्ण भरला. आता गडावरील अन्य पाण्याच्या टाक्या अशाच खुल्या होणार आहेत. शिवकालीन जलसंवर्धनाचे या टाक्या म्हणजे अस्सल साक्षीदार ठरणार आहेत.
रायगडाच्या याच धर्तीवर राज्यातील प्रमुख गड किल्ले संवर्धन करणे आता शक्य आहे .तसा निधीही केंद्र शासनाने काही गडासाठी दिला आहे. पण गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी झटणाया संस्था-संघटना असंख्य तरुण इतिहासप्रेमींना घेऊन संवर्धन करण्यासाठी उद्या कोल्हापुरात फोर्ट फेडरेशनची घोषणा होणार आहे. पुरातत्त्व, वन महसूल या विभागाची मदत आणि काही आर्थिक तरतूदही त्याद्वारे करण्याचे नियोजन आहे. उद्या दुर्ग परिषदेच्या निमित्ताने होणारी फोर्ट फेडरेशनची ही घोषणा गडकरी गड-किल्ले प्रेमींसाठी नक्कीच एका नवा नव्या आशेचा किरण असणार आहे.
दुर्गपरिषद खूप महत्त्वाची आहे. माझा वाढदिवस हे एक त्याचे केवळ निमित्त आहे. रायगड धर्तीवर केले जाणारे जतन-संवर्धन अन्य गड किल्ल्या साठी ही उपयोगी पडणार आहे. पण फोर्ट फेडरेशन ही संकल्पनाही खूप चांगली दिशा देणारी ठरणार आहे. आम्ही सर्व दुर्गप्रेमी तिथं मनाने राबवणार आहे.
खासदार संभाजीराजे छत्रपती