पुढच्या वर्षी लवकर या’ ची साद घालत जड अंतःकरणाने निरोप
प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हाभरात मंगळवारी पाच दिवसांच्या 19 सार्वजनिक तर 1 लाख 19हजार 213 घरगुती गणपती बाप्पांना गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या’ अशी साद घालत भावपूर्ण निरोप दिला. जिह्यातील समुद्र किनाऱयांबरोबरच, नदी, तलाव आदी विसर्जन घाटावर गणेशमूर्तींचे पारंपरिक आणि भक्तीमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.
रत्नागिरी जिल्हय़ात गणेश चतुर्थीला 1 लाख 66 हजार 539 घरगुती व 108 सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. कोरोनाचा काळ असल्याने यावर्षीही गणेशाचे आगमन जरी वाजत गाजत झालेले नसले तरी यावेळेस भक्तगणांनी गौरी गणपतीचा सण उत्साहात साजरा झाला. मंगळवारी गणपती विसर्जनावेळी सार्वजनिक गणपतींबरोबरच शहरातील घराघरांमध्ये प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या वैशिष्टयपूर्ण गणपतींचेही विसर्जन करण्यात आले.
घरी आलेल्या बाप्पाचे स्वागत जेवढय़ा जल्लोष आणि जोषात झाले तेवढय़ाच उत्साहात मात्र हळव्या अंतःकरणाने गणेशभक्तांनी मंगळवारी बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. पोलिसांचा फौजफाटा, सुरक्षारक्षक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आदी कार्यकर्ते यांच्या मदतीने विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होता. यावेळेसही गणेश विसर्जन मिरवणूकांवर कोरोना नियमांचे बंधन घालण्यात आलेले होते. त्यामुळे विसर्जन मिरवणूकांना पारंपरिक ढोल, ताशांच्या गजराचा थाट पहावयास मिळाला नाही.
जिल्हाभरात विसर्जन करण्यात आलेल्या गणपतीमूर्त्यांची संख्याः
जिल्हाभरात मंगळवारी 19 सार्वजनिक तर 1 लाख 19,213 घरगुती गौरी-गणपतीला जिह्यात बाप्पाचे सर्वात मोठे विसर्जन करण्यात आले. मंगळवारी जिह्यातील रत्नागिरी शहरामधील 5 हजार 825, रत्नागिरीच्या ग्रामीण भागात 7 हजार 699, जयगड परिसरात 1,766, संगमेश्वर 9,183, राजापूर 11,469, नाटे 6,187, लांजा 11, 740, देवरूख 8,170, सावर्डे 9,322, चिपळूण 9,785 , गुहागर 9, 150, अलोरे 5,300, खेड 10,632, दापोली 2,500, मंडणगड 3056, बाणकोटमध्ये 395, पूर्णगडमध्ये 3,776 आणि दाभोळमध्ये 1,258 इतक्या घरगुती गणपतीमूर्त्यांचे विसर्जन करण्यात आले.