गणित अध्यापकांच्या राज्य अधिवेशनाचे नेरुरपार येथे उद्घाटन : गणित अध्यापक महामंडळ विद्यापीठात रुपांतरित करा!
प्रतिनिधी / कुडाळ:
गणिताची गुणवत्ता टिकवायची, वाढवायची असेल, तर गणिताचे संशोधन करणाऱया विद्यापीठाची निर्मिती करा. गणित अध्यापक महामंडळाचे रुपांतर विद्यापीठात करा. त्याचा फायदा शिक्षक व विद्यार्थ्यांना होईल. साहजिकच गणित विषयाच्या माध्यमातून शिक्षणासाठी भरीव योगदान दिल्यासारखे होईल, असे मत राज्याचे माजी शिक्षण संचालक महावीर माने यांनी शुक्रवारी नेरुरपार येथे केले. शाळेत गणित विषय उत्कृष्ट करा, असे आवाहनही त्यांनी केले.
महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ आयोजित गणित अध्यापकांच्या 41 व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन नेरुरपार (ता. कुडाळ) येथील वसुंधरा विज्ञान केंद्रात माने यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. त्यावेळी ते बोलत होते. गणित अध्यापक महामंडळाचे अध्यक्ष सुनील श्रीवास्तव, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य पी. व्ही. जाधव, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, राज्य उपाध्यक्ष संजय बाजी पाटील, जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष वामन खोत, सचिव औदुंबर भागवत, महामंडळाचे सल्लागार व्ही. व्ही. आंबोळे, व्ही. एस. शिंदे, जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यापुढे शिक्षक नसलेला शिक्षणाधिकारी!
आतापर्यंत शिक्षक असलेली व्यक्ती बढती घेत, परीक्षा देत शिक्षणाधिकारी होत असे. त्यामुळे त्याला शिक्षणाबद्दल अनुभव असे. भविष्यात एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन तो या पदावर येईल. त्यामुळे पुढच्या काळात मोठी समस्या निर्माण होईल, अशी भीती माने यांनी व्यक्त केली. शिक्षकाने स्वत:चे ज्ञान वाढविले पाहिजे, तर चांगले शिक्षण देता येईल, असे माने यांनी सांगून आजचा शिक्षक प्रोफेशनल का झाला?, असा सवाल केला.
विनापरवाना शाळा शिक्षकांची परिस्थिती गंभीर!
राज्यातील विनापरवाना शाळांतील शिक्षकांची परिस्थिती गंभीर आहे. याप्रकरणी शिक्षक संघटनांनी दखल घेतली नाही. त्यांच्या व्यथा संघटना मांडत नाही, अशी खंत व्यक्त करत गणित अध्यापक महामंडळाने त्यांचे दु:ख जाणून घ्यावे, असे माने म्हणाले. घरमोलकरणीला तीन हजार रु. पगार दिला जातो. मात्र, खासगी शाळा विनाअनुदानितमध्ये संस्थाचालक दोन हजारांवर बोळवण करतात. शिक्षकांची किंमत, श्रेष्ठत्व, महात्म्य मोलकरणीपेक्षा कमी लेखले जात असेल, तर लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
नवीन अध्यापन पद्धती आत्मसात करा!
गणित शिक्षकांनी महामंडळाच्या माध्यमातून उपक्रमात सहभागी व्हावे. गणित शिक्षण अपडेट करा, अध्यापनाची नवीन पद्धती आत्मसात करा, असे आवाहन गणित राज्य महामंडळाचे अध्यक्ष सुनील श्रीवास्तव यांनी अध्यक्ष पदावरून बोलताना केले. महामंडळाने फेसबुक पेज काढले असून देशातील प्रत्येक राज्य, जिल्हय़ात गणित विषयावर काम केले जाते, याचेही व्हीडिओ आहेत. ते पाहावेत, म्हणजे आपल्यालाही नवीन अध्यापन पद्धती कशी आहे हे समजेल, असे ते म्हणाले.
चांगल्या निकालाचे गणित-विज्ञान शिक्षकांना श्रेय!
गणित अध्यापकांवर जबाबदारी सोपविली, तर प्रामाणिकपणे, खूप वेळ देऊन शिक्षक ती जबाबदारी पार पाडतो. जादा तास घेत जास्त तक्रारी करीत नाही, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी सांगत गणित व इंग्रजी विषयाचा निकाल चांगला लागला, तर शाळेचा निकाल चांगला लागतो, असे सांगत जास्त निकालाचे श्रेय गणित व इंग्रजीच्या शिक्षकांना जाते. मात्र, इतर विषयांच्या शिक्षकांचाही यात सहभाग असतो, असे ते म्हणाले. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी बसणाऱया मुलांची संख्या कशी वाढेल, यासाठी प्रयत्न व्हावेत, असे सांगतानाच गणित मंडळाने सराव परीक्षा घेण्याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याचे ते म्हणाले.
सिंधुदुर्गचा गणिताचा निकाल आघाडीवर!
जिल्हा सर्व निकालात आघाडीवर आहे. गणिताच्या निकालातही आघाडीवर आहे, असे डाएटचे प्राचार्य पी. व्ही. जाधव यांनी सांगून गणिताचा शिक्षक डिजिटल कसा बनेल, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले.
प्रास्ताविक संजय बाजी पाटील, तर स्वागत औदुंबर भागवत यांनी पेले. जिल्हाध्यक्ष वामन खोत यांनी कार्याचा आढावा घेतला. शिक्षणाधिकारी यांनी गणित शिक्षकांना अधिवेशनाला येण्यास मुभा देताना दोन दिवस डी. एल. देण्याबाबत सूचना न दिल्याने अनेक गणित शिक्षक आज येऊ शकले नाहीत, असे सांगत नाराजी व्यक्त केली. नरडवे हायस्कूलचे मुख्याध्यापक मनोहर काजरेकर यांनी गणित गीत सादर केले. सूत्रसंचालन डी. एस. पाटील व भाग्यविधाता वारंग यांनी केले. राज्य सहकार्यवाह एल. एन. लामखेडे (जळगाव), डी. के. पळसकर (वाशिम), राज्य सदस्य पी. के. बोंड (ठाणे), बी. ए. हावळे (बीड), एच. जी. देशपांडे (सातारा), पी. एन. पांढरे (रत्नागिरी), आर. पी. कावरे (अमरावती), एस. के. बिराजदार (सोलापूर), पी. बी. पंचभाई (नागपूर), आर. एम. येवले व अन्य पदाधिकारी, राज्यभरातील गणित शिक्षक मोठय़ा संख्येने सहभागी होते. सर्व राज्य पदाधिकाऱयांचा सत्कार करण्यात आला. पुरस्कारप्राप्त गणित शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
सिंधुदुर्गचा टर्निंग पॉईंट अन् सिंधुदुर्ग अव्वल
माने म्हणाले, जून 1997 मध्ये आपण सिंधुदुर्गात आलो. त्यावेळी जिल्हय़ाचा निकाल 40 टक्के होता. माझ्या मनाला हे खूप लागले. कोल्हापूर विभागात सगळय़ात कमी निकाल सिंधुदुर्गचा असायचा. त्यानंतर मागील निकाल तपासले ते कमीच आढळून आले. हे चित्र बदलण्यासाठी मुख्याध्यापकांची बैठक घेऊन गांभीर्याने विचार करा. निकाल वाढलाच पाहिजे, असे सांगत नियोजन करण्यात आले. वारंवार बैठका घेतल्या. मुख्याध्यापक-शिक्षकांच्या हजेरीचे प्रमाण वाढविले आणि 1998 मध्ये निकाल 57 टक्के लागला. त्यानंतर 68 ते 72 टक्के असा निकाल वाढत गेला आणि सिंधुदुर्ग त्यावेळी कोल्हापूर विभागात प्रथम आला. आता कोकण विभाग व राज्यातही प्रथम येत आहे. याकामी मुख्याध्यापक, शिक्षक व संस्थाचालकांसह पालकांनीही सहकार्य केले, असे त्यांनी सांगून जुन्या आठवणींना उजाळा दिला.