प्रतिनिधी / बांदा:
गणेशचतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून थकित वीज बीलांची जोरदार वसुली सुरु आहे. थकित बील रक्कम न भरल्यास कनेक्शन तोडण्याची धमकीही कर्मचार्यांकडून ग्राहकांना दिली आहे. सणाच्या तोंडावरच वसुलीचा तगादा लावल्याने आधीच कोरोनाने हैराण झालेल्या ग्राहकांना महावितरणनेही धक्का देण्यास प्रारंभ केला आहे. या पार्श्वभूमीवर बांद्यातील भाजप पदाधिकार्यांनी सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी उप कार्यकारी अभियंता घुरे यांची भेट घेतली. गणेशचतुर्थीच्या तोंडावर थकित बीलांसाठी वीज कनेक्शन तोडल्यास आंदोलन करण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला. भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब यांच्या सहीचे निवेदन सुपूर्द करण्यात आले. सध्या महावितरणकडून थकित वीज बीलांची वसुली सुरु आहे. ऐन सणाच्या तोंडावरच कनेक्शन तोडण्याच्या धमक्याही कर्मचार्यांकडून देण्यात येत असल्याने ग्राहकांमध्ये घबराट पसरली आहे. सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांच्या नेतृत्वाखाली उप कार्यकारी अभियंता घुरे यांची भेट घेण्यात आली. कोरोना काळात बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. उद्योगधंदे बंद पडले आहेत. आर्थिक उत्पन्न बंद झाल्याने वीज बीले थकित झाली आहेत. सणासुदीच्या काळात वीज कनेक्शन न तोडता थकित बीले हफ्त्यांमध्ये भरण्याची सुविधा द्यावी अशी मागणी करण्यात आली. अन्यथा महावितरणच्या अन्यायकारक धोरणाबाबत आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी अभियंता घुरे यांनी हफ्त्यांमध्ये बीले वसुली करण्याबाबत कर्मचार्यांना आदेश देण्यात येतील असे स्पष्ट केले. यावेळी भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब, जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, बांदा मंडल तालुकाध्यक्ष महेश धुरी, ज्ञानेश्वर सावंत, प्रविण देसाई, मधुकर देसाई, सत्यवान बांदेकर, तालुका प्रवक्ते केतन आजगावकर, सावंतवाडी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, गुरुनाथ सावंत, आत्माराम गावडे आदी उपस्थित होते. महावितरणचे उप कार्यकारी अभियंता घुरे यांना निवेदन देताना जावेद खतीब. सोबत संजू परब व अन्य.