नागरिकांची डोकेदुखी वाढली : मिलिटरी प्रशासनातर्फे वाहनधारकांची तपासणी करण्याचा सपाटा
प्रतिनिधी /बेळगाव
कॅन्टोन्मेंट परिसरातील रस्ते जनतेसाठी खुले करण्याचा आदेश संरक्षण खात्याने दिला आहे. यानुसार बहुतांश रस्ते खुले करण्यात आले. मात्र हे रस्ते संरक्षण खात्याच्या जागेवर आहेत. असा फलक लावून वाहनधारकांची तपासणी करण्याचा सपाटा मिलिटरी प्रशासनाने चालविला आहे. यामुळे वाहनधारकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव कॅन्टोन्मेंट व लष्करी प्रशिक्षण परिसरातील रस्ते सर्वसामान्य नागरिकांना ये-जा करण्यास बंद ठेवण्यात आले होते. पण या कारणास्तव अन्य रस्ते देखील बंद ठेवण्याचा प्रकार लष्कराने चालविला होता. परिणामी वाहनधारकांना गैरसोयीचे बनले होते. बेळगाव कॅन्टोन्मेट परिसरातील महत्त्वाचे आणि नागरिकांना सोयीचे असलेले रस्ते गेट बसवून आणि बॅरिकेड्स घालून बंद करण्यात आले होते. यामुळे याबाबतची तक्रार दिल्ली येथे संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कॅन्टोन्मेंट पदाधिकाऱयांच्या बैठकीत करण्यात आली होती. ही समस्या केवळ बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डची नसून 62 कॅन्टोन्मेंटमध्ये रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत. ही बाब संरक्षण मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. याची दखल घेऊन कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील सर्व रस्ते खुले करण्याचा आदेश संरक्षण मंत्र्यांनी बजावला होता.
पण कॅन्टोन्मेंट परिसरातील रस्ते खुले करण्यास टाळाटाळ चालविली होती. हा विषय कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीत घेऊन चर्चा करण्यात आल्यानंतर कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील रस्ते खुले करण्यात आले. ठिकठिकाणी असलेले ब्Ÿरिकेड्स टप्प्या टप्प्याने रस्ते सर्वसामान्य वाहनधारकांसाठी खुले करण्यात आले. हे रस्ते खुले केले पण अरगन तलाव गांधी चौकातून गणेशपूरला जाण्यासाठी वापरण्यात येणाऱया रस्त्यावर मिलिटरी प्रशासनाने वाहनधारकांची चाचपणी करण्याचा सपाटा चालविला आहे. ‘हे रस्ते संरक्षण खात्याच्या जागेत आहेत’. असा फलक लावून या रस्त्यांवर वाहने चालविताना हेल्मेट घालणे आवश्यक आहे. तसेच गेटवर खासगी सुरक्षा रक्षक नियुक्त करून वाहनधारकांना हेल्मेटची विचारणा करीत आहेत. तसेच विनाहेल्मेट असल्यास रस्त्यावरून जाण्यास वाहनधारकांना मज्जाव केला जात आहेत.
वाहनांचे कागदपत्र, इंन्शुरन्स, लायसन्स आणि अन्य कागदपत्रे असणे आवश्यक आहे. काही महत्त्वाच्या रस्त्यांवर मिलिटरी प्रशासनाच्यावतीने फलक लावण्यात आले आहेत. तसेच खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करून गणेशपूरकडे जाणाऱया वाहनधारकांना त्रास देण्याचे सत्र सुरू असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. शहरात विविध ठिकाणी कागदपत्रांची विचारणा रहदारी पोलीस करीत आहेत. आता कॅन्टोन्मेंटमधील रस्त्यावर हेल्मेटची विचारणा करून वाहनधारकांना त्रास देत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सर्वसामान्य नागरिकांना डोकेदुखी
काही वाहनधारक कॅन्टोन्मेंट परिसरातील रस्त्यांवर वाहनचालक परवाना नसताना वाहने चालवित आहेत. तसेच भरधाव वेगाने वाहने हाकने, विनाहेल्मेट वाहने चालविणे असे प्रकार घडत आहेत. कॅन्टोन्मेंट परिसरातील रस्त्यांवर रहदारी कमी असल्याने वाहनधारक मनमानीपणे हवी तशी वाहने चालवत आहेत. यामुळे यावर निर्बंध घालण्याचा निर्णय कॅन्टोन्मेंट बोर्डच्या बैठकीवेळी घेण्यात आला होता. याची अंमलबजावणी करण्यास मिलिटरी प्रशासनाने प्रारंभ केला आहे. पण याची डोकेदुखी सर्वसामान्य नागरिकांना होत असल्याची तक्रार करण्यात येत आहेत.