प्रतिनिधी/ खेड
विघ्नहर्त्या गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या 25 दिवसांवर येऊन ठेपले असताना मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डय़ांचे विघ्न मात्र दूर झालेले नाही. महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले खड्डे मृत्यूचे सापळे ठरत आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे सलग 2 वर्षे गणेशभक्तांना गावी येता आले नव्हते. यामुळे यावर्षी गणेशभक्तांचा गावी येण्याचा उत्साह शिगेला पोहचला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्याबाबत कुठलीच कार्यवाही झालेली नाही. पेण ते इंदापूर दरम्यानच्या मार्गाची दैनावस्था झाली आहे. वडखळ, नागोठणे, सुकेळी, कोलाड, इंदापूरपर्यंत कसरतीचा प्रवास कायम आहे.
महामार्गावर 1 ते 4 फुटांचे खड्डे आहेत. इंदापूर ते मुंबई या 3 तासांच्या प्रवासाला 5 ते 6 तास मोजावे लागत आहेत. याच खड्डय़ांमुळे वाहतूक कोंडीची समस्यादेखील गंभीर बनली आहे. आतापासूनच अपघातांची मालिकाही सुरू झाल्याने वाहतूक पोलीस यंत्रणेसह प्रशासनाचीही डोकेदुखी वाढली आहे.
गणेशोत्सवात धावणाऱया नियमित गाडय़ांसह गणपती स्पेशल गाडय़ांचे आरक्षणही हाऊसफुल्ल झाल्यामुळे गणेशोत्सवात महामार्गावर धावणाऱया वाहनांची संख्यादेखील बेसुमार वाढणार आहे. मात्र खड्डय़ांच्या विघ्नामुळे गणेशभक्तांना गाव गाठताना यंदाही अडथळय़ांची शर्यत पार करावी लागणार आहे.