डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात धरणे आंदोलन छेडून वेतन देण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
पाणीपुरवठा मंडळाच्या हंगामी कामगारांना एल ऍण्ड टी कंपनीकडे वर्ग करण्यात आले आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून वेळेवर वेतन देण्यात आले नाही. दिलेल्या वेतनात कपात करण्यात आली असून कामगारांनी थकित वेतनाबाबत चौकशी केली असता कोणी जबाबदारी घेत नाहीत. त्यामुळे हंगामी कामगारांनी बुधवारी राणी चन्नम्मा चौकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात धरणे आंदोलन छेडून वेतन देण्याची मागणी केली.
चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. याकरिता शहराच्या पाणीपुरवठा नियोजनाचा कारभार एल ऍण्ड टी कंपनीकडे सोपविण्यात आला आहे. तसेच पाणीपुरवठा मंडळाकडे काम करणाऱया 354 हंगामी कामगारांनादेखील 1 जुलैपासून एल ऍण्ड टी कंपनीकडे वर्ग करण्यात आले होते. पण आतापर्यंत एकच महिन्याचा पगार वेळेवर देण्यात आला आहे. त्यानंतर दोन महिन्यांचे वेतन देण्यात आलेले नाही. तसेच काही कामगारांच्या पगारात कपात करण्यात आली आहे.
पाणी नियोजनाचा कारभार हस्तांतर केल्यानंतर कामगारांना कामावर घेण्यात आले नव्हते. मात्र, याबाबत पाणीपुरवठा मंडळाकडे तक्रार केल्यानंतर सर्व कामगारांना एल ऍण्ड टी कंपनीकडे वर्ग करण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानुसार 354 कामगार वर्ग करण्यात आले. पण त्यांच्या पगारात कपात करण्याबरोबरच वेळेवर पगार देण्यात येत नसल्याची टीका करण्यात आली.
ऐन गणेशोत्सव सणातदेखील पगार देण्यात आला नसल्याने कामगारवर्गातून संताप व्यक्त करण्यात आला. गॅस, पेट्रोलचे दर गगनाला भिडले असून पगार नसताना उदरनिर्वाह कसा करायचा? असा मुद्दा कामगारवर्गाने उपस्थित केला आहे. वेतन वेळेवर देण्यात येत नसल्याने नाईलाजाने आंदोलन छेडावे लागल्याची प्रतिक्रिया यावेळी कामगारांनी व्यक्त केली. तसेच वेळेवर वेतन देण्याची मागणीही करण्यात आली. या आंदोलनात शेकडो हंगामी कामगार सहभागी झाले होते.