रूग्ण संख्या वाढत राहील्यास घेणार निर्णय, जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांची माहिती
प्रतिनिधी/ रत्नागिरी
गणेशोत्सवात येणाऱया चाकरमान्यांनी क्वारंटाईनचे निकष पाळले नाहीत आणि गणेशोत्सवानंतर देखील कोरोनाचे रुग्ण वाढतच राहिल्यास जिल्हय़ात पुन्हा लॉकडाऊन जाहीर केला जाऊ शकतो. कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी सात दिवसांची टाळेबंदी जाहीर केली जाऊ शकते अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन त्यांनी केले.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जनतेला माहिती देण्यासाठी आयोजित फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना जिल्हाधिकाऱयांनी ही माहिती दिली. एका ग्रामस्थाने गणेशोत्सवानंतर लॉकडाऊन वाढवणार का? असा प्रश्न उपस्थित केला. यावर बोलताना जिल्हाधिकारी यांनी सांगितले. कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशा वेळी गणेशोत्सवासाठी येणाऱया चाकरमान्यानी नियम पाळून गावात रहावे. शासनाने आखून दिलेले धोरण पाळावे. गावकऱयांनीही चाकरमान्यांना मदत करावी. नियम पाळले न गेल्यास आणि गणेशोत्सवानंतरही कोरोनाचे रुग्ण वाढत राहिल्यास जिल्हयात पुन्हा सात दिवसांचा लॉकडाऊन केला जाऊ शकतो असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र पुन्हा लॉकडाऊनची परिस्थिती येणार नाही यासाठी सर्वांचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी सांगितले.
या फेसबुक लाईव्हमध्ये अनेक नागरिकांना कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्याचबरोबर बाजारपेठा व सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सींगची अमलबजावणी होत नसल्याचे ही यावेळी लक्षात आणून दिले.
सोशल डिस्टन्सींग पाळाः डॉ. मुंढे
गणेशोत्सव साजरा करताना आरती, भजन, कीर्तनाला गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी यावेळी केले. कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढता येणार नाही, विसर्जनाला ही पाचपेक्षा अधिक माणसे नसावी सोशल डिस्टस्टींगचे काटेकोरपणे अंमलबजावणीसाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा असे आवाहन मुंढे यांनी केले.
शहर बस सेवा सुरू करण्याचा विचार
जिह्यात बसेस यंत्रणा सुरळीत करण्यासाठी बैठक झाली असून शासनाकडून गाईड लाईन आल्यानंतर नियोजन केले जाईल, शहर बसेस ही सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी सांगितले. या लाईव्ह कार्यक्रमाला जिल्हाधिकारी यांच्यासोबत पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे आणि मुख्यकार्यकारी अधिकारी इंदुमती जाकर उपस्थित होत्या.