9 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा
प्रतिनिधी/ रत्नागिरी
ऐन गणेशोत्सवाच्या तयारीची मोठी लगबग सुरू झालेली असताना जिल्हय़ात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. सोमवारी दिवसभर सोसाटय़ाच्या वाऱयासह जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. भारतीय हवामान खात्यातर्फे येत्या चार दिवसात रत्नागिरी जिह्याच्या अनेक भागात अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता बाळगावी व सुरक्षित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या अधुनमधुन सरी कोसळतानाचे चित्र होते. आतापर्यंत जिल्हय़ात 3,161 मिमि सरासरी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. सोमवारी सकाळपर्यंत झालेल्या 24 तासात 26.77 सरासरी इतके पर्जन्यमानाची नोंद झालेली होती.सोमवारी दापोली, खेड चिपळूण, गुहागर, संमगेश्वर, रत्नागिरी लांजा, राजापुरात सकाळ पासूनच पावसाने हजेरी लावली होती. कधी कमी अधिक तर कधी संततधार असणारा पाऊस दुपारनंतर मात्र चांगलाच बरसू लागला होता. सायंकाळी 6 नंतर आमावस्येच्या पार्श्वभूमीवर पाऊसाने चांगलाच जोर धरला होता.
10 सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरू आहे. या उत्सवासाठी जिल्हय़ात मोठय़ा संख्येने चाकरमानी गावाकडे सरकारी तसेच खासगी वाहनांने दाखल होत आहेत. अतिवृष्टीच्या इशाऱयामुळे 6 सप्टेंबर पासून रत्नागिरी जिह्यात येणाऱया काळात नागरिकांनी काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. पुलावरून संरक्षक दगडावरून पाणी वाहत असल्यास प्रवास टाळावा. धाडसाने वाहन पाण्यामध्ये घालू नये असे सांगण्यात आले आहे.
अतिवृष्टीमुळे वाहतूक विस्कळीत झाल्यास, सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. अनावश्यक ओव्हर टेक करून वाहनांच्या 3-3 रांगा करू नये. प्रवासात आवश्यक खबरदारी घ्यावी. वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. अतिवृष्टीमध्ये रस्त्यावर दरड कोसळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रवास करताना काळजी घ्यावी. आपले घर सुरक्षित असल्यास व अतिवृष्टीमुळे घरांमध्ये पाणी भरणार नाही याची खात्री असलल्यास घरातच सुरक्षित राहावे. या कालावधीमध्ये आवश्यकता नसेल तर घराच्या बाहेर पडू नये. घरामध्ये पाणी घुसून पाण्याची पातळी वाढत असल्यास तात्काळ घर सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अतिवृष्टीचा फटका टाळण्यासाठी दरडप्रवण भागातील समुद्र व खाडी किनारी तसेच नदी किनारी राहणाऱया सखल भागातील लोकांनी सावधगिरी बाळगावी. अतिवृष्टीमुळे पाणी पातळी वाढत असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. ग्राम कृती दलांनी सतर्क राहून वेळोवेळी तहसील कार्यालयास माहिती द्यावी. मासेमारीसाठी व पोहायला समुद्रात जाऊ नये. धबधब्याच्या ठिकाणी जाऊ नये. विजा चमकत असताना झाडाखाली थांबू नये. मोबाईलचा वापर करू नये. आपला जीव आपल्या मिळकतीपेक्षा महत्त्वाचा असल्याने प्रथम जीवितास प्राधान्य द्यावे अशा खबरदारीच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आल्या आहेत.
नागरिकांना आपत्ती निवारणासाठी संपर्कक्रमांक
मदत आवश्यक असल्यास आपल्या ग्रामपंचायत तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष 02352-222222 व जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्षाशी 02352-226248 / 222233 या क्रमांकावर तसेच तहसील कार्यालय यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.