संध्याकाळी काढलेला आदेश रात्री मागे घेण्याची पाळी
प्रतिनिधी /पणजी
एका नाटय़पूर्ण घडामोडीत गोवा सरकारने सायंकाळी एक फतवा जारी करुन गणेशोत्सवाला वेसण घालणारे निर्बंध वजा नियमावली जारी केली, मात्र त्यावरुन सरकारवर प्रचंड टीका सुरु होताच रात्री हा आदेश मागे घेण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजपच्या एका महत्त्वाच्या बैठकीनंतर आपण हा आदेश मागे घेतलेला आहे, परंतु जनतेने स्वतःवर नियम घालून घ्यावेत, असे नमूद केले आहे.
सरकारने सायंकाळी जारी केलेल्या एक फतव्यातून वरिष्ठ अधिकाऱयाने राज्यातील जनतेवर काही बंधने घातली होती. त्यातून गणेशोत्सवामध्ये पूजेला पुरोहिताला कोणाच्याच घरी जाता येणार नाही. जी काही घरी पूजा करायची आहे ती ऑनलाईन वा युटय़ूब आदींचा आधार घ्यावा आणि पूजा करावी, फटाके वाजवू नयेत, गणेश विसर्जनाच्या वेळा निश्चित कराव्यात, गर्दी करु नये तसेच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती वापरु नयेत. अशा अनेक नियमांचा त्यात समावेश होता.
सार्वजनिक उत्सावांवर टाच लावताना घरच्या घरी उत्सव करणाऱयांवर देखील नियम लागू करण्यात आल्याने राज्यात या आदेशानंतर एकच खळबळ माजली. या दरम्यान, भाजपच्याच अनेक कार्यकर्त्यांनी मुख्य़मंत्र्यांकडे तसेच प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांच्याकडे तक्रारी मांडल्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सदर नियमावली त्वरित मागे घेत असल्याचे जाहीर केले.
या नियमावलीत एवढे कडक निर्बंध जारी केले होते की, वैयक्तिक पातळीवरील धार्मिक उत्सवावर देखील बंधने लागू केली होती. दरम्यान, मुख्य़मंत्री डॉ. सावंत यांनी जनतेला स्वतः नियमांचे पालन करुन उत्सव साजरा करा, असा सल्ला दिला आहे.