वाढविलेले लॉकडाऊन जनतेच्या हितासाठीच – पालकमंत्री उदय सामंत
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोरोनाची साथ आटोक्मयात आणण्यासाठी जिल्हय़ात सध्या 8 जुलै 2020 पर्यंत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. हे लॉकडाऊन जनतेच्या हितासाठीच करण्यात येत असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी येथे सांगितले. तसेच कोरोनाचा धोका लक्षात घेऊन गणेशोत्सवाचे नियोजन करण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी प्रशासनाला दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हय़ातील लॉकडाऊनबाबतचा व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा पालकमंत्र्यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनजंय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, प्रादेशिक परिवहन अधिकारी जितेंद्र पाटील उपस्थित होते.
संसर्ग साखळी तोडणे आवश्यक!
पालकमंत्री म्हणाले, कोरोनावर मात करण्यासाठी या संसर्गाची साखळी तोडणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. सध्या जिल्हय़ात कोरोना रुग्ण बरा होण्याचा दर 67 टक्के असून मृत्यूदर 2.2 टक्के आहे. आर. टी. पी. सी. आर. लॅबमध्ये रोज सुमारे 100 स्वॅब टेस्टिंग केले जातात. आतापर्यंत 229 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 154 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. या सर्वांना डिस्जार्च देण्यात आला आहे. आतापर्यंत 3967 स्वॅब टेस्टिंग करण्यात आले आहेत. जिल्हय़ात सध्या कोरोनाबाधित 69 रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्हय़ात लॉकडाऊन केल्यामुळे ही संख्या आणखी कमी होऊन जिल्हा कोरोनामुक्त होऊ शकेल.
पालकमंत्री सामंत म्हणाले, नजीकच्या काळामध्ये गणपती उत्सव आला असून जिल्हय़ात मोठय़ा संख्येने चाकरमानी येणार आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. जिल्हा प्रशासनाने येणाऱया गणेशोत्सवाचे योग्य नियोजन करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करावी. त्या संदर्भातील नियोजनाचा आराखडा तयार करावा. सदरचा आराखडा शासनास सादर करून त्याची मंजुरी घेण्यासाठी राज्यस्तरावर प्रयत्न केले जातील. जिल्हास्तरीय समिती स्थापन करताना जिल्हय़ातील गणेश उत्सव मडळांच्या पदाधिकारी व घरगुती गणपतींच्या प्रतिनिधींचा समावेश करावा, अशा सूचना देऊन पालकमंत्र्यांनी ‘लालबागचा राजा’ मंडळाने जो उपक्रम यावषी हाती घेतला आहे, त्याच धर्तीवर जिल्हय़ातील गणेश मंडळांनी आरोग्य उपक्रम हाती घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी यावेळी जिल्हय़ामध्ये लॉकडाऊन सुरू केल्यापासूनच्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच जिल्हय़ामध्ये वैद्यकीय सेवांवर कोणतेही निर्बंध घातलेले नसून जिल्हय़ामध्ये औषधांची दुकाने पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास परवानगी दिली असल्याचे सांगितले.
जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम म्हणाले, जिल्हय़ामध्ये पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. तसेच रात्रीची गस्तही वाढविण्यात आली आहे. जिल्हय़ात प्रवेश करणाऱया सर्व प्रवेशांच्या ठिकाणी नाकाबंदी करून येणाऱयांची पूर्ण चौकशी करून जिल्हय़ात प्रवेश दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले.